श्रीरामांना कम्युनिस्ट शरण – संघपरिवाराला आव्हान देण्याची तयारी
वृत्तसंस्था/ मलप्पुरम
मागील काही काळापासून भारताचे राजकारण भगवान श्रीरामांच्या भोवतीच फिरताना दिसून येत आहे. सर्व राजकीय पक्ष भगवान श्रीराम यांच्या नावावरच जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने रामायणाकडे नजर वळविली आहे. केरळमध्ये भाकपच्या मलप्पुरम जिल्हा कमिटीने रामायणावर ऑनलाइन टॉक सीरिज सुरू केली आहे. या आयोजनाकडे उजव्या विचारसरणीच्या संघटना आणि संघपरिवाराच्या विरोधातील राजकीय युद्धात नवे अस्त्र म्हणून पाहिले जात आहे.
भाकप मलप्पुरमच्या जिल्हा समितीने स्वतःच्या फेसबुक पेजवर 7 दिवसीय ऑनलाइन टॉक प्रोग्राम सुरू केला आहे. यात पक्षाचे राज्यस्तरीय नेतेही रामायण आणि भगवान श्रीरामाबद्दल स्वतःची भूमिका मांडत आहेत. या कार्यक्रमाला ‘रामायण आणि भारतीय वारसा’ असे नाव देण्यात आले आहे. 25 जुलै रोजी सुरू झालेल्या या टॉक शोचा शनिवारी समारोप झाला आहे.
रामायण देशाच्या परंपरेचा हिस्सा
सद्यकाळात सांप्रदायिक आणि फॅसिस्टवादी शक्ती हिंदुत्वाशी निगडित प्रत्येक गोष्टीवर स्वतःचा दावा करतात. दुसरीकडे मोठय़ा प्रमाणावर समाज आणि अन्य राजकीय पक्ष यापासून दूर जात आहेत. रामायणासारखे महाकाव्य आमच्या देशाची परंपरा आणि संस्कृतीचा हिस्सा आहे. विकासाच्या काळात रामायण कसे वाचावे आणि समजून घ्यावे हे या टॉक शोद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न पक्षाने केल्याचा दावा भाकप मलप्पुरमचे जिल्हा सचिव पी.के. कृष्णादास यांनी केला आहे.
रामायणावर चर्चा
या ऑनलाईन संवादात अनेक मुद्दय़ांवर चर्चा झाली. भाकपचे नेते मुलक्करा रत्नाकरन यांनी रामायण काळातील लोक आणि अन्य देशांसोबतचे राजनयिक संबंध, तर भाकपचे नेत एम. केशवन यांनी रामायण काळातील राजकारणावर भूमिका मांडली आहे. कवी अलंकोड लीलाकृष्णन यांनी ‘अनेक रामायण’ (द मेनी रामायणन्स) यासारख्या विषयावर वक्ते म्हणून भाग घेतला.
कार्ल मार्क्सच्या मूल्याशी जोडले
रामायण काळातील राजकारण संघ परिवाराकडून होत असलेल्या राजकारणापेक्षा खूपच वेगळे होते. रामायणाचा सखोल अभ्यास केल्यावर कार्ल मार्क्सच्या द्वंद्वात्मक भौतिकवाद (Dialectical Materialism) सिद्धांताची बाब कम्युनिस्टांना सर्वप्रथम आठवत असल्याचे केशवन नायर यांनी म्हटले आहे. रामायण सांप्रदायिक शक्तींच्या हातातील अस्त्र ठरू नये हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी कम्युनिस्टांची आहे. रामायणाच्या फॅसिस्टवादी व्याख्येला त्याच्या वैविध्यपूर्ण स्वरुपाद्वारे विरोध करू शकतो असे उद्गार कवी लीलाकृष्णन यांनी काढले आहेत.