तृणमूल-भाजपमधील आरोप-प्रत्यारोप सुरूच
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तारुढ तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात वाप्युद्ध पेटले आहे. दोन्ही पक्षांचे नेते परस्परांवर टीका करण्याची एकही संधी वाया जाऊ देत नसल्याचे चित्र आहे. गंगासागर येथे पोहोचलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुजाऱयांनी दिलेले भगवे वस्त्र परिधान केल्यावर भाजपने त्यांच्या या नव्या अवतारावर टीका केली आहे.
एकेकाळी जय श्रीराम घोषणा ऐकल्यावर ममता बॅनर्जी यांचा पारा चढत होता. पण आज ममता बॅनर्जी गंगासागरमध्ये कपिल मुनी यांच्या मंदिरात भगव्या वस्त्रात दिसून आल्या आणि त्यांनी पूजाही केली आहे. हा त्यांच्यात घडलेला बदल आहे का निव्वळ ढोंग अशी खोचक विचारणा भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी केली आहे.
नागरिकत्व सुधारणा कायदा तसेच एनआरसीवरून ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. कुणाही अधिकाऱयाने कुठलीही माहिती मागितल्यास ती देऊ नका, अशी सूचना ममतांनी दक्षिण 24 परगणा येथे आयोजित सभेत करत भाजपला लक्ष्य केले आहे. कुणाचाही अधिकार हिरावण्यापूर्वी संबंधित यंत्रणेला माझा मृतदेह ओलांडावा लागेल, असे विधानही ममतादीदींनी केले आहे. तर भाजपने राज्यात एनआरसी प्रक्रिया राबविणारच अशी भूमिका घेतली आहे. भाजपने एनआरसी तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ सभांचा सपाटा लावला असून त्याला लक्षणीय प्रतिसादही मिळत आहे.