प्रतिनिधी/ सातारा
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रात मंदीचे सावट असताना भजनी मंडळानाही याचा फटका बसला आहे. गणेशोत्सवात शहरासह ग्रामीण भागात भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असतात. चालूवर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. यामुळे भजनी मंडळातील सदस्यांची कला सादर करण्याची संधी हुकलीच, शिवाय आर्थिक नुकसानही झाले आहे.
घरगुती गणेशोत्सव शहरात मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जातो. यावेळी प्रसिध्द भजनी बुवांना सिंगलबारी, डबलबारी भजनासाठी आमंत्रित केले जाते. मात्र यावर्षी कोरोनाचा संसर्ग वाढु नये म्हणून भजन, आरत्या करण्यास मनाई करण्यात आली आहे. मार्च महिन्यात लाँकडाऊन लागू झाले आणि सर्वच कार्यक्रम रद्द झाले. सिंगल आणि डबलबारी भजन करण्यासाठी 2 हजारापासून 10 ते 15 रुपयांपर्यत मानधन घेतात. परंतु गेली पाच- सहा महिने यांना मानधन मिळालेले नाही. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. लाँकडाऊनचे नियम टप्प्या टप्प्याने शिथिल होत आहेत. गणेशोत्सवात धार्मिक कार्यक्रमास परवानगी मिळेल असे वाटत होते. मात्र कोरोना बाधितांचा वाढता आकडा पाहता याबाबत अद्याप निर्णय घेतला जाणार नाही. आसे चित्र दिसत आहे. गणेशोत्सव सुरु असून मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे भजनी मंडळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.