प्रतिनिधी /बेळगाव
दरबार गल्ली-भडकल गल्ली कॉर्नर येथे गटारी तुंबल्या आहेत. गटारींची स्वच्छता योग्य पद्धतीने केली जात नसल्याने गटारी तुंबल्या जात असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, गटारींची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
भडकल गल्ली, जालगार गल्ली, दरबार गल्ली, शेट्टी गल्ली कॉर्नर या परिसरात अनेक ठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. गटारी तुंबल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या परिसरात दवाखाने, हॉटेल व इतर व्यवसाय असून, या ठिकाणी येणाऱयांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. गटारींमध्ये इतर कचरा फेकला जात असल्याने गटारी तुंबत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यामुळे गटारीची स्वच्छता करण्याची मागणी रहिवाशांकडून मनपाकडे केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱया परिसरात अशाप्रकारे अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत असेल तर शहरातील इतर भागातील विचार न केलेलाच बरा. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच तुंबलेल्या गटारींची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.