प्रतिनिधी/ बेळगाव
भडकल गल्ली, जालगार गल्ली व खडक गल्लीच्या काही भागात मागील 15 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. पाणी उपलब्ध नसल्याने महिलांचे हाल होत असून मिळेल त्या ठिकाणाहून पाणी आणण्याची वेळ आली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत मोठमोठी स्वप्ने दाखविली जात असताना दुसरीकडे पाण्यासाठी शहरातील मध्यवर्ती भागातील नागरिकांना वणवण करावी लागत आहे, असे विदारक चित्र पहायला मिळत आहे. यामुळे या समस्येची दखल घेऊन तातडीने पाणीपुरवठा करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांमधून केली जात आहे.
शहरात होणाऱया पाणीपुरवठय़ाचे काम खासगी कंपनीकडे सोपविण्यात आल्यापासून पाणीपुरवठय़ाचे तीनतेरा वाजले आहेत. कोणत्याही भागात दिलेल्या वेळेत पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. पाणीपुरवठय़ामध्ये नियमितपणा आणण्यासाठी खासगी कंपनीकडे कंत्राट देण्यात आले खरे. परंतु यामुळे तक्रारी जास्त वाढल्याचे दिसत आहे. काही विभागात 8 ते 10 दिवस पाणी नसल्याने नागरिकांना टँकर मागवून पाणी घ्यावे लागत आहे. ज्यांच्याकडे पाणी साठविण्यासाठी व्यवस्था नाही अशा लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे त्वरित पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.
पाणीपुरवठा मंडळाच्या गलथान कारभाराचा रहिवाशांना फटका
-सुभाष मातबर (रहिवासी)
भडकल गल्ली-खडक गल्ली येथील आतील भागात पाण्याची मोठी समस्या आहे. शहराचा मध्यवर्ती भाग असूनही 15 दिवसांपासून पाण्याविना रहावे लागत आहे. पाणीपुरवठा मंडळाच्या गलथान कारभाराचा फटका रहिवाशांना बसत असून पाणी न सोडल्यास आंदोलनाचा इशारा सुभाष मातबर यांनी दिला.