हॅलो मॅडम, मी रेवती बोलते. आपल्याजवळ थोडं बोलायचं होतं. हां बोला ना. मॅडम कसं सांगावं तेच कळत नाही, माझा मुलगा सार्थक हल्ली विचित्रच वागतो. म्हणजे? अहो, काय सांगू? मांजराला फार घाबरतो. अलीकडे मांजर पाहिलं की धडधडतं त्याला. मला काही सुचत नाही. अहो मांजरासारखा प्राणी तो. काय घाबरण्यासारखं आहे त्यात तेच कळत नाही. शेजारची मुलगी लहान असूनही तास न् तास खेळते मांजरासोबत आणि हा, हा मुलगा असूनही घाबरतो. मला तर याचीच लाज वाटते. घाबरतो की नाटक करतो त्याचे त्यालाच माहीत.
बरं, तुमच्याजवळ मी नंतर बोलते. आता तो आहे का तिथे? मला त्याच्याशी बोलायचं आहे. हो आहे ना. असे म्हणत त्यांनी सार्थकला फोन दिला. तू प्लीज जा मम्मा, मग मी बोलतो त्यांच्याजवळ. या एका वाक्मयातून आणि आईच्या एकंदरच बोलण्यातून मला बऱयाच गोष्टी लक्षात आल्या होत्या. साधारणपणे 20 ते 25 मिनिटे त्याच्यासोबत चर्चा झाली भेट आवश्यक होती, भेटण्यासाठी तो तयारही झाला. नंतर प्रत्यक्ष भेटीत बऱयाच गोष्टींचा उलगडा झाला. काही काळ समुपदेशन सुरू राहिले आणि सार्थकचे उत्तम सहकार्य, त्याने केलेले प्रामाणिक प्रयत्न त्यामुळे भीती बाजूला करण्यात यश मिळाले.
सार्थकसारखी अशी अनेक माणसे भेटत असतात. परंतु, आजही आपल्या समाजात अनेक गोष्टींबद्दल समज-गैरसमज पहायला मिळतात. जसे गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे अमुक कामे स्त्रियांनी करायची अशी वर्गवारी असते तसे मुलगा किंवा पुरुष म्हणजे त्याने रडायचे नाही, घाबरायचे नाही हा जणू अलिखित नियमच. खरेतर स्त्री किंवा पुरुष हे शिक्के न मारता त्या पलीकडचा ‘माणूस’ पण समजून घेणे गरजेचे आहे. स्त्री काय वा पुरुष काय भावना या असणारच आहेत. शरीरासारखे मनही आजारी पडू शकते तिथे जेंडरचे लेबलिंग कशासाठी? भीती ही एक अनैच्छिक प्रतिक्रिया आहे. समजा आपण रस्त्यावरून चालत आहोत. अचानक एक भला मोठ्ठा कुत्रा अंगावर धावून आला त्याक्षणी विचारमंथन करायला आपल्याला वेळ मिळतो का? त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी काही बदल क्षणार्धात घडतात. भीती आणि क्रोध अशा संरक्षक प्रतिक्रिया तात्काळ व्हायला हव्यात म्हणून त्या बऱयाच अंशी नियंत्रणाखाली नाहीत. माणसाचे संकटापासून संरक्षण करण्यासाठी भीती अर्थात क्षणार्धात दक्ष करण्याचे काम एडेनालाईन हार्मोन करतात. क्षणार्धात शरीरात त्याचे प्रमाण वाढते, हृदयाचे ठोके वाढतात. शरीराला होणाऱया शुद्ध रक्ताचा पुरवठा वाढतो, श्वासाची गती वाढते, हात-पाय, शरीरात वाढलेली रक्ताची गरज पूर्ण होते, डोळय़ातील बाहुली मोठी होते, लांबचे स्पष्ट दिसण्यासाठी नजर तीक्ष्ण होते. शरीराच्या हालचाली अधिक वेगाने होतात. काही वेळ शरीराची सर्व शक्ती संरक्षक उपायांसाठी राखून ठेवण्यासाठी पचनासारखी कामे तात्पुरती बंद केली जातात. हे सर्व परिणाम त्याक्षणी शरीराला अधिक बळ प्राप्त करून देतात आणि आपण संकटापासून आपण पळू शकतो. अगदी नैसर्गिक रीतीने हे सारे बदल होतात. समोर आलेला धोका मोठा असेल तर त्याक्षणी पळणे गरजेचेच असेल तर भीती निर्माण होते. जर आपण संकटाचा सामना करू शकत असलो तर क्रोध निर्माण होतो आणि आपण संकटाशी सामना करायला सज्ज होतो. जर काहीच करता येत नसेल तर आपली स्थिती फ्रीज झाल्यासारखी होते. फाईट-फ्लाईट-फ्रीज या आदिम प्रेरणा आहेत. अर्थात त्याक्षणी तशा प्रतिक्रिया घडणे हे अगदी नैसर्गिक असते परंतु समजा ती गोष्ट घडून गेली, उदा. कुत्रा अचानक अंगावर येतो आहे म्हटल्यावर भीतीमुळे आपण पळण्यासाठी सज्ज झालो परंतु त्यानंतर मात्र घरात शांत बसलेले असताना कुत्र्याचा नुसता आवाज ऐकला आणि त्या आवाजानेच भीती उत्पन्न झाली, पुन्हा शरीरामध्ये तशाच क्रिया घडू लागल्या तर मात्र सारेच अवघड होईल.
चिंता व भीती संपूर्णपणे टाळणे अशक्य आहे. प्रत्येकाला आपापली खास दु:खे, चिंता व भीती असतेच. अनेकवेळा आपल्याला भीती वाटते आहे की नाही यापेक्षा त्या भयाला बाजूला करून आपण आपले कर्तव्य पार पाडतो आहे की नाही हे अधिक महत्त्वाचे असते. काही गोष्टींची भीती आपण समजू शकतो पण काही मात्र अनाकलनीय असते. सार्थक मांजराला घाबरतो. लांबून मांजर दिसले तरी जागच्या जागी खिळून राहतो. मांजराचे चित्र जरी त्याने पाहिले तरी त्याच्यासाठी फार अवघड होते, अशी भीती मात्र साधीसुधी नाही. याला फोबिया म्हणतात. भीती विकृत झाली की तिचे रूपांतर फोबिया अर्थात भयगंडात होते. भीती विकृत झाली, भीती निरर्थक आहे हे माहीत असूनही ती टाळता येईनाशी झाली की ती फोबियात बदलू लागते. त्यामध्ये एखाद्या वस्तूची, विशिष्ट परिस्थितीची तीव्र अनाकलनीय भीती वाटते. अशी वाटणारी भीती ठीक नाही हे कळत असले तरी ती भीती वाटतेच. ‘कळतं पण वळत नाही’ अशीच काहीशी स्थिती असते. भयभीत करणारी वस्तू, वातावरण टाळले की भीती कमी होते. फोबियाचे वर्गीकरण तीन वर्गात केले जाते अगोरा फोबिया, सोशल फोबिया व स्पेसिफिक म्हणजेच विशिष्ट प्रकारचा फोबिया. अगोरा या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे ‘बाजार’. यामधे रुग्णाला गर्दीचा जिथून सुटणे कठीण आहे अशा जागांचा फोबिया असतो. सोशल फोबियामध्ये माणसांमध्ये मिसळणे टाळले जाते. इतर सर्व प्रकारांचे भय भयगंडाच्या तिसऱया प्रकारात मोडते. उदाहरणार्थ विविध वस्तू, आजार व मृत्यू यांचे भय, प्राणी, रक्ताचे भय इ. उंदीर, पाली, झुरळ यांना घाबरणारी माणसे अनेकदा विनोदाचा विषय होतात परंतु ही भीती फोबियापर्यंत जाऊ शकते. सर्व फोबियांमध्ये एक समान सूत्र आहे ते म्हणजे फोबिक वस्तू टाळली की रुग्णाला हलके वाटते परंतु या तात्पुरत्या सुटकेमुळे यावर मात करण्याचे प्रयत्न त्याच्या हातून होत नाहीत. भयगंड जेवढा तीव्र तेवढी टाळाटाळ अधिक. बऱयाचदा ही भीती अनाठायी आहे हे कळते पण वळत नाही अशी बऱयाच रुग्णांची स्थिती पहायला मिळते. त्याचे कारण असे आहे की, डोळय़ासमोर येते त्याची जागृत मनाला जाणीव होण्यासाठी तीनशे पन्नास मिनी सेकंद लागतात. मात्र डोळय़ातील रेटिनामध्ये तयार झालेली लहर मेंदूतील भीती निर्माण करणाऱया भागापर्यंत पोचवण्यासाठी अवघ्या पन्नास मिनी सेकंदाचा कालावधी लागतो. म्हणजेच, जागृत मनाला अर्थात बुद्धीला जाणीव व्हायच्या आतच 50 मिनी सेकंदामध्ये ती लहर आपल्या भावनिक मेंदूपर्यंत पोचलेली असते. त्यामुळे आपला भावनिक मेंदू त्वरित प्रतिक्रिया करतो म्हणूनच कळण्याच्या आतच वळलेले असते. नुसता विचार बदलून भीती कमी होत नाही याचे हेच कारण आहे.
फोबिया होण्यामध्ये मेंदूतील जैवरासायनिक प्रक्रिया जशा कारणीभूत होतात तसेच मनावर कोरले गेलेले भीतीचे संस्कार व भीती कमी करण्याच्या प्रयत्नांची टाळाटाळ हे घटकही जबाबदार आहेत. अर्थातच एकाच लेखामध्ये हे सारे मांडणे शक्मय नाही, त्यामुळे अधिक जाणून घेऊया पुढच्या भागात….
Ad. सुमेधा देसाई, मो. 94226 11583