खासदार थरूर यांचे उद्गार : पूर्णवेळ अध्यक्ष निवडावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसला स्वतःची प्रतिमा वाचविण्यासाठी पूर्णवेळ अध्यक्ष निवडावाच लागणार आहे. जनतेत पक्षाची प्रतिमा ‘दिशाहीन’ पक्षाची होत चालली असून ही धारणा मोडीत काढण्यासाठी पूर्णवेळ अध्यक्षाची गरज आहे. राहुल गांधी यांच्यात पक्षाचे पुन्हा नेतृत्व करण्याची योग्यता तसेच पात्रता आहे. परंतु राहुल यांना अध्यक्ष व्हायचे नसल्यास काँग्रेसने नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू करावी असे उद्गार काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी काढले आहेत.
सोनिया गांधी हंगामी अध्यक्षा म्हणून 1 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार असताना थरूर यांनी हे विधान केले आहे. काँग्रेस पक्ष भरकटल्याची जनतेत निर्माण होणारी प्रतिमा सुधारावी लागणार आहे. राष्ट्रीय पातळीवर विरोधकाची भूमिका पार पाडण्यास पक्ष सक्षम नसल्याची धारणा मोडीत काढावी लागणार असल्याचे ते म्हणाले.
राहुल पुन्हा अध्यक्ष झाल्यास…
राहुल पुन्हा नेतृत्व स्वीकारण्यास तयार असल्यास त्यांनी केवळ राजीनामा मागे घ्यावा. डिसेंबर 2022 पर्यंतच्या कार्यकाळासाठी त्यांना निवडण्यात आले होते. परंतु त्यांची इच्छा नसल्यास अन्य नेत्याची निवड करावी लागणार आहे. काँग्रेस कार्यकारिणी समिती आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे पक्षाला अनेक लाभ होऊ शकतात, असे थरूर यांनी म्हटले आहे.