प्रतिनिधी/ रत्नागिरी
जयगड समुद्र किनाऱयापासून 11 नॉटीकल मैल अंतरातील खोल समुद्रात सोमवारी मध्यरात्री इंजिन बिघडल्याने मुंबईतील मच्छीमारी नौका भरकटली होती. ही नौका व त्यावरील 11 खलाशांना वाचवण्यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून राबवण्यात आलेले 8 तासांचे ऑपरेशन यशस्वी झाले आहे. भरकटलेल्या नौकेला टगच्या साहाय्याने सुखरूप किनाऱयावर आणण्यात आले. मेरीटाईम बोर्ड, तटरक्षक दल, जेएसडब्ल्यू पोर्ट, सागरी सुरक्षा दल आदींच्या एकत्रित प्रयत्नातून ही मोहीम यशस्वी करण्यात आली.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर वेगवान वारे वाहत आहेत. समुद्रही खवळलेला असल्याने मच्छीमारांसमोर संकट उभे राहिले आहे. सोमवारी 18 मे रोजी रात्री 12 च्या सुमारास पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलाला एक मच्छीमारी नौका खोल समुद्रात अडकून पडल्याची खबर मिळाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश रामभाऊ दळवी यांनी तत्काळ ही माहिती मेरीटाईम बोर्डाचे पॅ. संजय उगलमुगले यांना दूरध्वनीवरुन दिली.
समुद्रात बंद पडले इंजिन
मुंबई येथील ‘विजया महेश्वरी’ या मच्छीमारी नौकेचे रात्रीच्या सुमारास अचानक इंजिन बंद पडले. या नौकेवर तांडेलांसह 11 खलाशी होते. त्यांनी खोल समुद्रातच नांगर टाकून मदतीसाठी प्रयत्न सुरु केले होते. खवळलेल्या समुद्रामुळे पाण्यात नौका हेलकावे खात होती. नांगरावर जास्त काळ नौका उभी ठेवणे धोकादायक होते. त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी नौकेवरील तांडेल सुदेश दाभी यांच्याकडून मदतीसाठी प्रयत्न सुरु होते.
सागरी सुरक्षा दलाकडून संदेश मिळाल्यानंतर पॅ. उगलमुगले यांनी तत्काळ मदतीसाठी पावले उचलली. तटरक्षक दलाचे कमांडन्ट आणि जेएसडब्ल्यूचे पॅ. रविचंद्रन यांच्याशी संपर्क साधला. तटरक्षकची नौका घटनास्थळाकडे रवाना झाली. पाठोपाठ नौका ओढून आणण्यासाठी आवश्यक असलेली जेएसडब्ल्यूची टग बोट पाठवण्यात आली.
टग बोट पोहचण्यातही अडथळे
वाऱयाच्या वेगामुळे टग बोटीलाही लाटांमुळे घटनास्थळी पोहचण्यात अडथळे होते. प्रतिकुल परिस्थितीमध्ये मच्छीमारी नौकेच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणा कार्यरत होत्या. मध्यरात्रीपासून सुमारे 8 तास त्या भरकटेल्या नौकेला व त्यावरील खलाशांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. इंजिन बंद पडल्यामुळे टग बोटीच्या साह्याने ‘विजया महेश्वरी’ ला मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 8 च्या सुमारास जयगड येथील महाराष्ट्र मेरी टाईमच्या जेटीला सुखरूप आणण्यात आले. या ऑपरेशनमुळे नौकेबरोबरच 11 खलाशांचे प्राण वाचवण्यात यश आले. ती नौका आणि खलाशी जयगड बंदराच्या ठिकाणी सुरक्षित असल्याचे पॅ. उगलमुगले यांनी सांगितले.
या बचाव कार्यात येथील महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी पॅ. संजय उघलमुगले यांच्या मार्गदर्शनाखाली जेएसडब्ल्यू पोर्टचे प्रमुख, तटरक्षक दल आणि पोलिसांचे सागरी सुरक्षा दल आणि जिल्हा प्रशासनाने यात महत्त्वाची भुमिका बजावली.