आपली प्रत्येक कृती आपल्या प्रकृतीवर कोणता ना कोणता परिणाम करते असे संशोधनाअंती दिसून आले आहे. विशेषतः खाण्याचा वेग आणि वजन वाढण्याचा वेग एकमेकांना पूरक ठरतात. याचाच अर्थ असा की, बकाबका खाणे हे वजनवाढीस कारणीभूत ठरते. वाढते वजन ही अलिकडच्या काळातील सर्वात मोठी आणि विश्वव्याती समस्या बनली आहे. तिचा संबंध नीट न चावता खाण्याशी आहे, असे नुकत्याच झालेल्या संशोधनात आढळून आलं आहे.
वास्तविक या संशोधनात नवं ते काय, असा प्रश्न आपल्याला पडेल. कारण अनेक दशकांपासून ही बाब ज्ञात आहे. म्हणूनच ‘चावून चावून’ खा असा उपदेश बालपणापासून आपण ऐकत असतो. एक घास 32 वेळा चावावा म्हणजे अन्नाचे पचन चांगले होते, हे आपल्याला सांगण्यात येतं. तथापि नव्या संशोधनात चावण्याचा आणि वजनवाढीचा नेमका संबंध स्पष्ट करण्यात आला आहे.
अन्न चांगले चावून खाण्यामुळं त्यातील पचावयास जड असणारे घटक मृदू होतात. आपल्या लाळेत अन्नातील काही घटक पचविण्याची क्षमता असते. शिवाय अन्न चांगले चावल्याने शरिरात नेमक्या प्रमाणात अन्न पचविणारी द्रव्यं तयार होतात आणि पचनक्रिया समतोल राहते. त्यामुळं अन्नघटकांचे चरबीमध्ये रूपांतर कमी प्रमाणात होतं. तसंच आपलं पोटही चावून खाल्यानं लवकर भरतं. अन्न भरभर गिळल्यानं नेमकं किती अन्न शरिराला हवं आहे हे आपल्याला लक्षात येत नाही आणि शरिराची संदेश यंत्रणाही असमतोल होते. परिणामी बहुतेक वेळा अशा स्थितीत अन्न जास्त खाल्लं जातं आणि त्यामुळंही वजन वाढतं, असं दिसून आलं आहे. म्हणूनच कमीत कमी श्रमात वजन नियंत्रणात ठेवायचं असलं, तर प्रत्येक घास मोजून आणि अनेकदा चावूनच खाल्ला पाहिजे, असं तज्ञ सांगतात.