वीज कार्यालयासमोर निदर्शने, वीजमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन
प्रतिनिधी / पणजी
ग्राहकांना शॉक देणारी भरमसाठ वीजबिले माफ करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने पणजीतील मुख्य वीज कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी त्यांनी वीजमंत्री नीलेश काब्राल यांची प्रतिमाही दहन केली. येत्या 15 दिवसात वीज खात्याने याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
काँग्रेसने आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्य वीज अभियंत्यांना सादर केले. मुख्यमंत्री, वीजमंत्री यांनी त्यात लक्ष घालून जनतेला दिलासा द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. विरोधी पधनेते दिगंबर कामत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली पणजीतील मुख्य वीज कार्यालयासमोर पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱयांनी मोठय़ा संख्येत जमून निदर्शने केली. आमदार कामत, श्री. चोडणकर यांच्यासह अमरनाथ पणजीकर, संकल्प आमोणकर, प्रतिमा कुतिन्हो यांनी सरकार, वीज खात्याच्या विरोधात भाषणे करून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.
लॉकडाऊनच्या दोन महिन्याच्या काळातील वीजबिले माफ करावी. ते शक्य नसेल तर फेब्रुवारीची बिलेच (रक्कम) मार्च-एप्रिल महिन्यासाठी घ्यावी. रु. 5000 पेक्षा जास्त बिलांना 50 टक्के सवलत द्यावी असे अनेक पर्याय काँग्रेसतर्फे निवेदनातून वीज खात्याला सूचवण्यात आले आहेत. वीज ग्राहकांना दुप्पट, तिप्पट दराने हजारोंची बीले आली आहेत. अनेकांनी कर्ज काढून ती बीले भरल्याची माहिती श्री. चोडणकर यांनी दिली. कोरोनामुळे सध्या गरीब जनतेची परिस्थिती बिकट असून त्यांना दिलासा देणे व वीजबिले माफ करणे किंवा सवलत देणे हे सरकारचे कर्तत्व आहे. ते न निभवता वीजखाते व सरकार मोठय़ा रक्कमेची बीले देऊन जनतेला लूटत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस नेत्यांनी केला. काँग्रेसतर्फे गेल्या महिनाभर तालुका स्तरावर वाढीव वीज बिलांच्या विरोधात आंदोलने करण्यात आली होती. त्याची सांगता म्हणून पणजीत हे आंदोलन करण्यात आले. जनतेच्यावतीने काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या मागणीकडे वीज खात्याने, सरकारने साफ दुर्लक्ष केले असून जनतेला दिलासा देण्यासाठी कोणताही निर्णय घेतला नाही. त्याचा निषेध म्हणून वीजमंत्री काब्राल यांची प्रतिमा जाळण्यात आली आणि सरकारचा विरोधात आवाज उठविण्यात आला तसेच घोषणाबाजी करण्यात आली. पाऊस असूनही या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळला.