प्रतिनिधी / सातारा :
अल्पवयीन मुलींचे लग्न करु नका याबाबत वारंवार प्रबोधन करुन देखील समाजात असे काही विवाह होतच असतात. कोरेगावमध्ये देखील अशाच एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळताच मुलीच्या मातापित्यांना बोलवून त्यांचे समुपदेशन करुन मुलीचा विवाह रोखण्याची कामगिरी भरोसा सेलने बजावली आहे.
जिल्हय़ात मार्च महिन्यात जिल्हा पोलीस दलाकडून भरोसा सेलची स्थापना करण्यात आली असून, यामध्ये बालक, ज्येष्ठ नागरिक व महिलांकडून होणाऱ्या तक्रारींचे निरासन केले जात आहे. दि. 25 जून रोजी देखील कोरेगाव येथील शाहूनगर बेघरवस्तीतील एका अल्पवयीन बालिकेचा विवाह साताऱ्यातील चंदनगरमधील युवकाशी होणार होता.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता आंमदे-मेणकर यांना शहनिशा करुन कारवाई करण्याची सूचना केली. आमंदे यांनी तातडीने अल्पवयीन मुलीच्या मातापित्यांना भरोसा सेल येथे बोलावून घेतले. त्यांचे समुपदेशन करुन मुलगीचे योग्य वय झाल्यावर तिचे लग्न करा असा सल्ला. यामुळे अल्पवयात होणारा बालिकेचा विवाह रोखला गेला.
या कारवाईत पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आंमदे-मेणकर, हवालदार नंदकुमार चव्हाण, पोलीस नाईक परशुराम वाघमारे, तृप्ती माहिती यांनी सहभाग घेतला.