वायंगणीत बंद घराच्या टेरेसवरील प्रकार : परिसरात भीतीचे वातावरण
प्रतिनिधी / आचरा:
वायंगणी भंडारवाडी (दांडवळ) येथील सुभाष साटम यांच्या बंद घराच्या टेरेसवरच शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दोन बिबटे बसलेले तेथील गुरे आणण्यासाठी गेलेल्या युवकांना दिसले. गावात भरदिवसा बिबटय़ांचा संचार वाढल्यामुळे वायंगणी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने या बिबटय़ांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
शनिवारी सायंकाळी साडेपाच-सहाच्या सुमारास गुरे आणण्यासाठी गेलेले वायंगणी येथील मयुरेश पेडणेकर, रितेश लाड यांना साटम यांच्या टेरेसवर गुरगुरल्या सारखा आवाज आल्याने त्यांनी वर पाहिले असता, टेरेसच्या कठडय़ावर दोन बिबटे बसलेले दिसून आले. त्यांनी ही खबर ग्रामस्थांना देताच बिबटे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. ग्रामस्थांचा गलका वाढल्याने दोन्ही बिबटय़ांनी टेरेसवरून उडी मारत जंगलात धूम ठोकल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पंधरा दिवसांपूर्वी वायंगणी सरपंच संजना रेडकर यांच्या घरालगतच्या जंगलात बिबटय़ांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. त्या दिवसांपासून काहीजणांचे पाळीव कुत्रे पण गायब झाले होते. पण दिवसा-उजेडी असे बिबटय़ांचे दर्शन कधी झाले नव्हते. मात्र, शनिवारी ते मुंबईत असल्याने घर बंद असलेल्या साटम यांच्या टेरेसवरच सायंकाळी सहाच्या दरम्यान बिबटय़ांनी ठाण मांडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबटे दिवसा मनुष्य वस्तीत येऊ लागले, तर येथील शेतकऱयांची जनावरे किंवा ग्रामस्थांवरही हल्ला करू शकतील, अशी भीती वायंगणी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दिवसा जंगल सोडून मनुष्य वस्तीत आलेल्या बिबटय़ाच्या जोडगोळीने वायंगणीत दहशत पसरली असून या बिबटय़ांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.