96 कोटी रूपयांची योजना
प्रतिनिधी/ रत्नागिरी
वादळी वाऱयामुळे समुद्र किनाऱयानजीक वीज वाहिन्या तुटणे, अपघात होणे व त्यानंतर वीजवाहिन्या पुनर्स्थापित होण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन भुयारी वीज वाहिन्यांच्या महत्वाकांक्षी कामाचा रत्नागिरी शहरात श्रीगणेशा करण्यात आला आहे. कोरोनाचे संकट आणि मुसळधार पावसातही कंत्राटदाराकडून हे काम सुरू असल्याने नियोजीत कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
रत्नागिरी जिह्यात पहिल्या टप्प्यात रत्नागिरी शहर परिसराला ही योजना लागू करण्यात आली आहे. शिरगाव, मिऱया, कर्ला व रत्नागिरी शहरातील राममंदिरापासून समुद्र किनाऱयापर्यंतचा भाग या योजनेत समाविष्ट आहे. यामध्ये 18 किमी लांबीची 33 के.व्ही उच्चदाब वाहिनी व 85 किमी लांबीची 11 के.व्ही उच्च दाब वाहिनी भुयारी स्वरूपात नेली जाणार आहे. याचबरोबर 185 किमी लांबीची लघुदाब वाहिनीही भुयारी स्वरुपात होणार आहे. यासाठी 96 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून कंत्राटदाराने हे काम सुरु केले आहे. हे काम दीड वर्षात पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोना संकटामुळे काम सुरु करण्यास विलंब झाला असला तरी चार यंत्रांद्वारे हे काम वेगाने प्रगतीपथावर जात आहे. 11 के. व्ही उच्च दाब वाहिनीच्या 85 किमी पैकी 3.5 किमी, लघुदाब वाहिनीच्या 185 किमीपैकी 4 किमी काम पूर्ण झाले आहे. कोरोनामुळे कंत्राटदाराला वाढीव मुदत मिळण्याची शक्यता असली तरी हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास जावे म्हणून यंत्रणा प्रयत्नशील आहे.
महावितरणचे वरिष्ठ अधिकारी प्रगतीचा अहवाल सातत्याने घेत आहेत. भूमिगत वीजवाहिन्यांमुळे देखभालीचे काम कमी होणार असून अखंडित वीज पुरवठा दीर्घकाळ देणे महावितरणला देणे शक्य होणार आहे.