शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांचे मत : केंद्राच्या उच्चस्तरीय व्हर्च्युअल बैठकीत सहभाग
प्रतिनिधी / बेंगळूर
पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने बारावीची परीक्षा घेणे महत्त्वाचे आहे, असे मत शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी व्यक्त केले. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आयोजिलेल्या सर्व राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांच्या व्हर्च्युअल बैठकीत सहभाग घेऊन ते बोलत होते. व्यावसायिक कोर्सच्या प्रवेशांसह विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्यकालीन वाटचालीसाठी बारावीतील टक्केवारी महत्त्वाची असल्याने परीक्षा घेऊन गुणांकन करणे योग्य ठरणार असल्याचे मत त्यांनी नोंदवले.
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कर्नाटकात दुसरी लाट ओसरल्यानंतर तात्काळ 15 ते 20 दिवसांची वेळ देऊन परीक्षांची तारीख जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच कोरोनामुळे गेल्यावर्षी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची याचवर्षी पुनर्परीक्षा घेण्याचे नियोजन सरकारने केले आहे. अनेकजणांनी परीक्षेची प्रक्रिया सुलभपणे घेण्याचे मत व्यक्त केले आहे. त्यानुसार सुलभरित्या परीक्षा घेण्यासाठी 45 दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण खात्यानेही कमी अवधीत परीक्षा पार पाडण्यासाठी सल्ला दिला आहे, असे त्यांनी सांगितले.
गेल्यावर्षी कोरोना काळात दहावीची परीक्षा यशस्वीरित्या पार पाडल्याचा कर्नाटक सरकारला अनुभव आहे. मात्र, यंदा कोरोनाच्या दुसऱया लाटेत बारावीची परीक्षा घेणे फारच अवघड आहे, असेही मंत्री सुरेशकुमार म्हणाले. विद्यार्थ्यांचे शिक्षण, पालकांची मानसिकता, केंद्र सरकारच्या सूचनांना अनुसरून परीक्षेबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम पूर्ण
राज्यात बारावी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच परीक्षा केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. अतिशय सुरळीतपणे परीक्षा घेण्यासाठी सर्व पूर्वतयारी झाली आहे. एखाद्यावेळेस जुलै महिन्यात परीक्षा झाल्यास ऑगस्ट महिन्यात परीक्षांचा निकाल जाहीर करणे शक्य आहे. नीट, जेईई, सीईटी, आयसीएआर अशा स्पर्धात्मक परीक्षांसाठी ऑगस्ट महिन्यात तारीख ठरविणे योग्य आहे, असे मतही सुरेशकुमार यांनी व्यक्त केले.