माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केल्या भावना
कोरोनाच्या संकटामुळे बिघडलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी भारताला नजिकच्या काळात मोठी कसरत करावी लागेल, असे देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. सध्याची भारताची आर्थिक स्थिती 1991 पेक्षाही आव्हानात्मक आहे. एक राष्ट्र म्हणून भारताला आता कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे हे आत्ताच निश्चित करणे गरजेचे आहे. येत्या काही वर्षातील देशाची वाटचाल आव्हानात्मक ठरू शकते, असेही त्यांनी पुढे स्पष्ट पेले. देशात आर्थिक उदारीकरणाचे धोरण सुरू होऊन 30 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी वर्तवलेली ही मते महत्त्वपूर्ण मानली जात आहेत.
1991 मध्ये काँग्रेसने अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण सुधारणा केल्या. देशातील आर्थिक धोरणांसाठी नवी दिशा दिली. त्यामुळे आता जगातील महत्वाच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताला स्थान मिळाल्याचा दावा डॉ. मनमोहन सिंग यांनी केला आहे. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 30 वर्षापूर्वी एक ऐतिहासिक बजेट सादर केले होते. या बजेटमध्ये आधुनिक भारताच्या आर्थिक विकासाचा पाया रचण्यात आला होता. त्यानुसार नरसिंह राव पंतप्रधान असताना जगासाठी भारतात गुंतवणुकीचे दरवाजे खुले केले होते.
30 वर्षांपूर्वी केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे 30 कोटी भारतीय नागरिक गरिबीतून बाहेर आले. नवीन नोकऱया निर्माण झाल्या. सुधारणांच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी लोकांना स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा निर्माण झाली. भारतात अनेक मल्टीनॅशनल कंपन्या काम करीत आहेत. त्यामुळे भारत वैश्विक शक्ती म्हणून उदयास आली आहे, असेही मनमोहन सिंग पुढे म्हणाले.