- मृतांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्र्यांकडून दिलगिरी व्यक्त
ऑनलाईन टीम / मुंबई :
भांडुपमध्ये कोविड सेंटरला लागलेल्या आगीच्या घटनास्थळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. ज्या रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना संकटामुळे तात्काळ उपचारासाठी राज्यात रुग्णालये आणि कोविड सेंटर उभारण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यात हे मॉलमधले हॉस्पिटल आहे. राज्यभर जिथे शक्य तिथे कोविड हॉस्पिटल्सना परवानगी दिली होती. या हॉस्पिटलला तात्पुरती परवानगी होती.31 मार्चला ही मुदत संपणार होती.
व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना स्थलांतरित करण्यासाठी वेळ लागला, आणि त्यात काही रुग्णांचा मृत्यू झाला, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, अशा दुर्घटना घडू नये, म्हणून याआधीच सूचना देण्यात आलेल्या आहेत, की जिथे जिथे आरोग्य व्यवस्था उभारण्यात आलेली आहे, तिथले स्ट्रक्चरल ऑडीट करा. त्यामुळे अशा घटना का घडतायत, याबाबत पुन्हा चाचपणी केली जाईल. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल, आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहे.
- मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख
मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारतर्फे 5 लाखांची नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे.