प्रतिनिधी /बेळगाव
प्रत्येक पावसाळय़ात पाण्याचा निचरा होत नसल्याने ताशिलदार गल्ली, भांदुरगल्लीतील रस्त्यावर सांडपाणी साचून राहते. काही घरांमध्ये देखील पाणी शिरत असल्याने समस्येचे निवारण करावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर या समस्येचे निवारण करण्यासाठी मुहूर्त मिळाला असून, तानाजी गल्ली व फुलबागगल्ली येथील रेल्वे मार्गाखाली डेनेज वाहिन्या बदलण्याचे काम करण्यात आले आहे.
कपिलेश्वर रोड परिसरात उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. मात्र सांडपाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीने कोणत्याच उपाययोजना रेल्वेखात्याने केल्या नव्हत्या. परिणामी प्रत्येक पावसाळय़ात ताशिलदारगल्ली, भांदुरगल्ली अशा विविध भागातील गटारी तुंबून घरांमधून पाणी शिरत होते. या समस्येचे निवारण करण्यासाठी भांदुरगल्ली रेल्वे फाटकाजवळील डेनेजवाहिनीची दुरूस्ती करण्यात आली होती. पण तरी देखील या समस्येचे निवारण झाले नव्हते. प्रत्येक पावसाळय़ात दोन्ही रेल्वे फाटकाजवळ पाईपच्या तोंडाजवळ कचरा साचून पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नव्हता. या ठिकाणी लहान आकाराच्या पाईप असल्याने ही समस्या निर्माण होत होती. तात्पूरती दुरूस्ती करून महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले होते.
सदर समस्येचे निवारण करण्यासाठी अखेर मुहूर्त मिळाला असून डेनेजवाहिनी व पाईप घालण्याचे काम नुकतेच हाती घेण्यात आले आहे. सदर रेल्वे मार्गाखालील पाईप घालण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. तसेच फुलबागगल्ली व भांदुरगल्ली रेल्वे फाटकावरील ट्रकखाली पाईप घालण्याचे काम सुरू करण्यात आले. सदर काम हाती घेण्यात आल्याने वर्षानुवर्षे निर्माण झालेल्या समस्येचे निवारण होणार आहे.