सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने समस्या : परिसरातील समस्येचे निवारण करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
कपिलेश्वर रोड परिसरात उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली, पण परिसरातील समस्यांचे निवारण करण्यात आले नाही. रेल्वे मार्गामुळे सांडपाणी वाहण्याची समस्या कित्येक वर्षांपासून जैसे थे आहे. भांदूर गल्ली परिसरातील गटारीमधील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने गटारी तुडुंब भरल्याने विहिरी व कूपनलिकांचे पाणी दूषित बनले आहे. त्यामुळे परिसरातील सांडपाण्याच्या समस्येचे निवारण करण्याची मागणी होत आहे.
भांदूर गल्लीच्या मागील बाजूस रेल्वे मार्ग असल्याने रेल्वे मार्गाच्या खालून गटारीचे पाणी वाहण्यासाठी भूयारी गटारी बांधण्यात आल्या आहेत. पण सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने समस्या जैसे थे आहे. कपिलेश्वर रोड परिसरातील रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. त्यामुळे येथील समस्येचे निवारण होईल, अशी अपेक्षा होती. पण परिसरातील समस्या जैसे थे आहे. या परिसरातील गटारीची स्वच्छता व्यवस्थित केली जात नसल्याने सांडपाणी साचून रहात आहे. सध्या या परिसरातील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने गटारी तुंबल्या आहेत. परिणामी साचलेले सांडपाणी विहिरीमध्ये पाझरत आहे. त्यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले असून पाण्याचा वापर करणे मुष्कील बनले आहे. शहरात पाण्याची समस्या निर्माण झाल्यास विहिरीचा आधार घेतला जातो. पण सांडपाण्यामुळे विहिरीचे पाणी खराब झाल्याने पाण्याची समस्या भेडसावत आहे. भांदूर गल्ली परिसरातील सांडपाण्याची समस्या कित्येक वर्षांपासून जैसे थे आहे. याबाबत येथील रहिवाशांनी महापालिकेकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. पण याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
तसेच परिसरातील भंगी बोळातील कचऱयाची उचल करण्याकडे महापालिकेच्यावतीने दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे कचरा साचून रहात आहे. सांडपाणी आणि कचऱयामुळे परिसर अस्वच्छ बनला आहे. येथील समस्येचे निवारण तातडीने करण्यात यावे, अशी मागणी येथील रहिवासी स्नेहा दळवी, उदय दळवी, मंदाकिनी दळवी, राजू मेलमट्टी, नागराज कग्गणगी, महादेवी कग्गणगी, सुरेखा दळवी, रेणुका बेल्लद, वैशाली दळवी, दीपा नाईक आदींनी केली आहे.