मगो नेते सुदिन ढवळीकरांचा आरोप : ऑनलाईन शिक्षण बनले विद्यार्थ्यांसाठी शिक्षा
प्रतिनिधी /फोंडा
गोवा मुक्तीनंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर व मगो पक्षाने जे शैक्षणिक धोरण आखले, त्यामागे दूरदृष्टी होती. खेडोपाडी आणि गावोगावी शाळा सुरु करुन गोरगरीब कुटुंबातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा त्यामागे विचार होता. मुक्तीनंतरची पिढी त्यामुळचे सुशिक्षित होऊ शकली. ऑनलाईन शिक्षणाचा फज्जा उडवून भाजपा सरकारने भाऊसाहेबांच्या या शैक्षणिक धोरणालाच हरताळ फासलेला आहे. हे शिक्षण नसून ती एकप्रकारची शिक्षाच बनली आहे, असा आरोप मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी दिला आहे.
पंधरा दिवसात ऑनलाईन शिक्षणाच्या साधनसुविधांमध्ये सुधारणा न झाल्यास येत्या 24 जुलै रोजी पालकांसह पणजीच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलनाला बसण्याचा इशारा ढवळीकर यांनी दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप आहेत, त्यांचे शिक्षण नेटवर्क अभावी बुडाले आहे, तर गरीब कुटुंबातील मुलांचे स्मार्टफोन नसल्याने शिक्षण अडले आहे. त्यासाठी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सरकारने मोफत स्मार्टफोन उपलब्ध करून द्यावेत. शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणासंबंधी तांत्रिक प्रशिक्षण द्यावे व येत्या पंधरा दिवसांत नेटवर्क व कनेक्टिविटिची समस्या दूर करावी अशी मागणी मगो पक्षाने केली आहे. या प्रमुख तीन मागण्यासंबंधीचे लेखी निवेदन आमदार सुदिन ढवळीकर यांनी मंगळवारी सकाळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पंचवाडकर व फोंडय़ाचे उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांना सादर केले.
वर्षभर सरकारने कोणते प्रयत्न केले?
सरकारने ऑनलाईन शिक्षणाचा बट्टय़ाबोळ केल्याचा आरोप प्रसारमाध्यमांसमोर बोलताना ढवळीकर यांनी केला. नेटवर्कची समस्या व स्मार्ट फोन अभावी गावातील अनेक गरीब कुटुंबातील मुले आज शिक्षणापासून वंचित राहत आहेत. जी परिस्थिती शालेय व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची आहे, तिच अडचण उच्च माध्यमिक व अभियांत्रिकीसारखे व्यावसायिक शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना भेडासावत आहे. कोरोना महामारीला आता दीड वर्ष होत आले. या काळात सरकारकडे गावोगावी मोबाईल टॉवर्स उभारून नेटवर्कमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी पुरेशी वेळ होती. मात्र मागील एका वर्षांत सरकारने ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या साधनसुविधा उभारण्यास कोणतेच प्रयत्न केलेले नाहीत, असे सुदिन ढवळीकर म्हणाले. येणाऱया विधानसभा अधिवेशनात आपण हा विषय कॉल ऍटेंन्शनद्वारे सरकारपुढे मांडणार आहे. सरकारकडून जोपर्यंत त्यावर योग्य उत्तर मिळत नाही, तो पर्यंत विधानसभेसमोर ठाण मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय अधिवेशन संपल्यानंतर आझाद मैदानावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
शिक्षणसंस्था चालविणाऱया आमदारांनी काय केले ?
फोंडा तालुक्यातील एकाही गावात सध्या व्यवस्थित नेटवर्क नाही. तालुक्यातील दोन आमदार मोठय़ा शिक्षण संस्था चालवतात. त्यांनी गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांचे हे प्रश्न सोडविण्यासाठी कोणते प्रयत्न केले ? तालुक्याच्या मंत्र्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या या समस्येकडे कधी लक्ष घातले का ? असा प्रश्न ढवळीकर यांनी उपस्थित केला. यापुढे शिक्षणाचा हा प्रश्न गावोगावी जाऊन पालकांसमोर मांडला जाईल, असा त्यांनी सांगितले.
कवळे पंचायतीकडे वाढत्या तक्रारी ः राजेश कवळेकर
कवळेचे सरपंच राजेश कवळेकर यांनी गेली पाच वर्षे कवळे पंचायत क्षेत्रात नेटवर्कची समस्या असल्याचे सांगितले. येथील विद्यार्थी आज नेटवर्क अभावी ऑनलाईन शिक्षण व परीक्षाही योग्यप्रकारे देऊ शकत नाहीत. यापूर्वी आपण पंचायत क्षेत्रात दोन टॉवर्स उभारण्याचा प्रयत्न केला होता. त्याला जोरदार विरोध झाला. ग्रामसभेतही हा विषय उपस्थित करण्यात आला. आज त्याच लोकांना नेटवर्कचे महत्त्व कळून आले आहे. साधारण तिनशे ते चारशे लोकांच्या सहय़ांचे निवेदन पंचायतीला सादर करून नेटवर्कचा हा प्रश्न सोडविण्याची मागणी पालक करीत आहेत. फोंडा तालुक्यातील प्रत्येक सरपंच व पंचसदस्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले.
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनीही मांडल्या व्यथा
अभियांत्रिकी विद्यार्थी सिद्धय नाईक यांनी ढवळी भागात कुठल्याच मोबाईल कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याचे सांगितले. सकाळी 9 वा. आपले वर्ग सुरु होतात. रोज सकाळी घराबाहेर भर पावसात नेटवर्क शोधावे लागते. त्यासाठी पंचायत पातळीवर व्हायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्याने केली. आदित्य ढवळीकर या विद्यार्थ्याने सध्या ऑनलाईन माध्यमातून परीक्षा देण्यासाठी एक तर फोंडा शहर किंवा जेथे चांगले नेटवर्क आहे तेथे जावे लागत असल्याचे सांगितले. व्यावसायिक शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांनी नेटवर्क अभावी मोठी गैरसोय झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मगो पक्षाचे फोंडय़ातील नेते डॉ. केतन भाटीकर, फोंडा गटाध्यक्ष अनिल नाईक, नगसेविका गिताली तळावलीकर, केंद्रीय समितीचे अनंत नाईक, नरेश गावडे, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, बांदोडय़ाचे सरपंच राजेश नाईक, पंचसदस्य रामचंद्र नाईक तसेच कवळे व अन्य पंचायतीचे पंचसदस्य व मगो कार्यकर्ते उपस्थित होते.