दर्शनी भाग केला चकाचक; पाठीमागील भाग मात्र विद्रुप : संरक्षण जाळी तुटलेल्या स्थतीत
प्रतिनिधी /पणजी
गोव्याचे भाग्यविधाते आणि पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मिरामार येथील समाधीस्थळचा दर्शनी भाग चकाचक केला; मात्र पाठीमागच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे भाऊसाहेबांच्या चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मिरामार येथील भाऊसाहेबांचे समाधीस्थळी दरवर्षी 12 मार्च रोजी पुण्यतिथी व 12 ऑगस्ट रोजी जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या निमित्त आदारांजली वाहण्यासाठी समाधीस्थळ खुले केले जाते. यानिमित्त साफसफाई, रंगरंगोटी केली करण्यात येते.
सामान्यपणे मुख्यमंत्री मंत्री तसेच इतर राजकीय नेते भाऊप्रेमी तसेच सरकारी अधिकारी मोठय़ा संख्येने समाधीस्थळाच्या दर्शनी भागात येऊन पुष्पांजली वाहतात. यानिमित्त दर्शनीभागाची साफसफाइ करून टईल्स वगैर चकाचक केले आहेत. मात्र पाठीमागच्या बाजूला विद्रुप चित्र दिसत आहे. येथील संरक्षणासाठी असलेली जाळी मोडून गायब झाली आहेत. पाठीमागील संरक्षण भिंतींची कोणतीही देखभाल केलेली दिसन नाही. किंबहुना रंगरंगोटीही केलेली नाही. पावसाळ्यात दरवर्षी समाधीच्या खालील भागात पाणी साचून राहते. गेली अनेकवर्षे अशीच स्थिती आहे. मात्र याच्या उपाययोजनेबाबत संबंधित विभागाने कोणतीही हालचाल केलेली. दरम्यान भाऊसाहेबांच्या समाधीस्थळ पर्यटनाच्या दृष्टीने सुशोभित करावे. तसेच पर्यटकांना भाऊंचे कार्य अवगत करण्यासाठी त्यांच्या कार्याचे माहिती फलक लावावे,अशी मागणी भाऊप्रेमींकडून केली जात आहे.