प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटीचे काम करताना झाडे तोडल्यास तक्रार करा, संबंधित कंत्राटदारावर कारवाई करू, अशी ग्वाही कार्यकारी संचालक शशीधर कुरेर यांनी दिली तरी झाडांची कत्तल सुरूच आहे. भाग्यनगर सातवा क्रॉस येथे झाडांची कत्तल सुरूच आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामात सुनियोजन नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भाग्यनगर हिरवाईने नटलेला परिसर असून येथील झाडांमुळे गारवा मिळतो. झाडांची कत्तल सुरूच राहिली तर शुद्ध हवा मिळणे अशक्य होणार आहे. जुन्या वृक्षांची अशीच कत्तल झाली आहे तर बेळगाव फक्त सिमेंट काँक्रीटचे जंगल होईल व पुढील पिढय़ांसाठी आपण फक्त रखरखीतपणाच ठेवणार आहोत, हे नक्की. झाडे लावण्यात तत्परता नाही पण झाडांची कत्तल करण्यात ती दाखवली जाते, याचे कारण काय? झाडांची कत्तल केली तर आपण झाडांचे पुनर्रोपण करत आहोत, असे शशीधर कुरेर यांनी सिटिझन फोरम कौन्सिल सदस्यांशी केलेल्या चर्चेत सांगितले होते. परंतु हे पुनर्रोपण शहराबाहेर होत आहे.
परिणामी ज्या नागरी वसाहतीत हिरवाई, सावली व प्राणवायूची गरज आहे ती वंचित राहत आहे. याबाबत शशीधर कुरेर लक्ष घालून झाडे कापली जाणार नाहीत याची जबाबदारी घेतील का? असा प्रश्न भाग्यनगर येथील कार्यकर्ते दीपक अवरसेकर व नागरिक करत आहेत.