प्रतिनिधी /पणजी
भाजप सरकार मिशनरीज ऑफ चॅरिटीचा अर्ज नाकारून त्यांना काम करण्यापासून परावृत्त करत आहे आणि आपल्या भगव्या संघटनांचा आधार घेवून अल्पसंख्याकांवर हल्ले करत आहेत, असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी रविवारी केला.
गिरीश चोडणकर यांनी रविवारी पणजी येथे पत्रकार परिषद घेऊन अल्पसंख्यांकवर होत असलेल्या अन्यायाबद्दल बोलताना भाजपवर टीकास्त्र सोडले. पात्रता अटींची पूर्तता केली नसल्याच्या बहाण्याने मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या फॉरेन कॉन्ट्रिब्य?शन (रेग्य?लेशन) कायद्या खाली नोंदणीच्या नूतनीकरणासाठी अर्ज नाकारण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीचा त्यांनी निषेध केला.
यावेळी काँग्रेस नेते तुलियो डिसूझा आणि एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी उपस्थित होते.
चोडणकार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे आणि त्यांच्यावर हल्ले करणे सुरू आहे. “भाजप सरकार सत्तेत आल्यापासून अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे, जे घडलेल्या अनेक घटनांवरून दिसून येते.” असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, भाजप सरकार एनजीओच्या कामातही अडथळे निर्माण करत आहे. “भाजप हे राजकीय लाभ मिळवण्यासाठी आणि सत्ता काबीज करण्यासाठी करत आहे.’’ असे ते म्हणाले.
चोडणकर म्हणाले की, मदर तेरेसा यांच्या या संस्थेने कु÷रुग्णांना बरे होण्यासाठी मदत केली होती आणि सर्वांना त्याची माहिती आहे. ’’परंतु या संघटनेवर भाजपकडून संघटित हल्ले होत आहेत. हे आम्ही खपवून घेणार नाही.’’ असे चोडणकर म्हणाले.
चोडणकर म्हणाले की, भाजपच्या राजवटीत अल्पसंख्याक समाजावर अत्याचार झाले आणि होत आहेत. “प्रथम मुस्लिमांना लक्ष्य केले जात होते, आता ते ख्रिश्चनांना लक्ष्य करत आहेत. आपल्या संविधानाने प्रत्येक धर्माला त्यांच्या धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र भाजप त्यांना हे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे.’’ असे चोडणकर यांनी म्हटले.
नरेंद्र मोदी आपल्या संघटनांचा वापर करून अल्पसंख्याकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. “मोदींनी अशा संस्था?च्या कामकाजावर निर्बंध घातले आहेत. या सरकारला आम्ही त्यांच्यावर अन्याय करू देणार नाही.’’ असे ते म्हणाले.
मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या कामकाजावर मर्यादा घालून संघ परिवाराला संतुष्ट करण्याचा मोदींचा प्रयत्न असल्याचेही चोडणकर म्हणाले. “मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या संस्थेचे नूतनीकरण करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहावे अन्यथा भाजप अल्पसंख्याकांच्या विरोधात असल्याचे सिद्ध होईल.” असे चोडणकर म्हणाले.
चोडणकर म्हणाले की, ज्या राज्यांमध्ये भाजपची सरकारे आहेत त्यांनी ख्रिसमसच्या उत्सवात अडथळा आणला आहे आणि अलीकडच्या काळात चर्चची तोडफोड केली आहे. ” यामुळे आपली सामाजिक बांधणी आणखी नष्ट होईल.” असे मत त्यांनी व्यक्त केले. तुलिओ डिसूझा म्हणाले की, धर्मादाय संस्था?ना भाजप सरकारकडून परावृत्त केले जात आहे. “आम्ही भाजपच्या कृत्याचा निषेध करतो. वंचित आणि गरीब कुटुंबांची काळजी घेण्यासाठी धर्मादाय कार्य आवश्यक आहे. ” असे ते म्हणाले.