कोल्हापूर / प्रतिनिधी
भाजपने गुरूवारी महानगरपालिकेच्या कसबा बावडा येथील घनकचरा प्रकल्पातील कचरा घोटाळ्य़ाचा भांडफोड केला. प्रकल्पात वर्षानुवर्षे पडून असलेला कचरा कोणतीही प्रक्रिया न करता परस्पर काही शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन विकला जात असल्याचा प्रकार समोर आणला. तसेच एक लाख टन कचरा शेतात पसरल्याचा प्रकार उघडकीस आणला.
महानगरपालिकेच्या लाईन बाजार येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात (झुम प्रकल्प) अनेक वर्षापासून शहरातून संकलित केलेला लाखो टन घन कचरा पडून आहे. येथील कचऱ्यावर प्रक्रिया करून नष्ट करण्यासाठी ठेकेदार नेमला आहे. 2020 पासून हा कचरा हलविण्यास सुरू आहे. सुमारे 2 लाख क्यूबिक मिटर म्हणजे अंदाजे 1 लाख टन कचरा कमी झाल्याचे मनपा अधिकारी सांगत आहेत. परंतू हा कचरा कोणतीही प्रक्रिया न करता आणि कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय कसबा बावडा, शिये, राजाराम कारखाना परिसरातील काही शेतात टाकला जात असल्याचे भाजपाच्या कसबा बावडा मंडलच्या कार्यकर्त्यांचा निदर्शनास आले. यावेळी धीरज पाटील, राजाराम परीट, विवेक कुलकर्णी, ओंकार खराडे आदी उपस्थित होते.
भाजपाचे महानगर उपाध्यक्ष प्रदीप उलपे, चंद्रकांत घाडगे, प्रवक्ते अजित ठाणेकर, युवा मोर्चा अध्यक्ष विजयसिंह खाडे पाटील आणि मंडल अध्यक्ष डॉ. सदानंद राजवर्धन यांनी कचरा प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांना जाब विचारला. वस्तुस्थितीची ताबडतोब पहाणी करून योग्य ती कारवाई करा. त्याच बरोबर पसरलेला कचरा संबंधितांना पुन्हा उचलून नेण्यास भाग पाडावे. पर्यावरणाची हानी करणाऱ्या तसेच कायदा मोडणाऱ्या सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी फिल्ड ऑफिसर अर्जुन जाधव यांना घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यास सांगितले. त्यानंतर जाधव, महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील आणि घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे आरोग्य अधिकारी निखिल पाडळकर यांनी बावड्य़ातील विविध ठिकाणी भेट दिली. येथील शेतामध्ये कचरा पसरला असल्याचे दिसून आले. तसेच प्रत्यक्ष अधिकाऱ्यांच्या समक्ष अनेक डंपर भरून कचरा येत असल्याचे दिसले.
ज्या ठिकाणी कचरा पसरला जातो. त्यालगतच्या काही शेतकऱ्यांनी त्यांना होणाऱ्या त्रासाचा पाढा वाचला. पिकाचे नुकसान कसे होते हे दाखविले. यावर डॉ. विजय पाटील यांना यावेळी कार्यकर्ते आणि नागरिकांना धारेवर धरले. अशा प्रकारे कचरा कसा काय पसरला जातो असा जाब विचारला. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अर्जुन जाधव यांनी तीन ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पसरलेल्या कचऱ्याचे छायाचित्र काढून घेत पंचनामा केला. येथून पुढे कचरा टाकू नये, अशा सूचना केल्या.
प्रक्रिया न केलेला कचरा घातक आहे. याची माहिती नसल्याने काही शेतकरी शेतामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी तसेच खड्डय़ांमध्ये भराव टाकण्यासाठी मनपाच्या काही कर्मचाऱयांना बळी पडून कचरा विकत आहेत. महापालिकेत घरफाळा घोटाळा, डांबर घोटाळा गाजला. आता कचऱयातूनही मलई मिळवण्याचा नवीन घोटाळा समोर येत आहे.