फडणवीस यांच्या पाच वर्षातील कारभाराची गृहमंत्र्यांकडून चौकशी करणार
कोल्हापूर /प्रतिनिधी
भाजपकडून सुशांतसिंग आत्महत्या, अमलीपदार्थ सेवन, कंगना राणावत, मुख्यमंत्र्यांचा रावण म्हणून अवमान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना धमकीचे प्रयत्न, असे अजेंडे राबवत महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, अशी टीका करत भाजपच्या अशा भडकवण्याच्या प्रकरणांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भीक घालू नये असे आवाहनही ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी केले. याचवेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाच वर्षाच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापालिका स्थायी समिती सभापती सचिन पाटील, माजी नगरसेवक विनायक फाळके, राजू लाटकर आदी उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, बिहार येथे जाऊन माजी मुख्यमंत्री फडणवीस हे महाविकास आघाडी सरकारकडून दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप केला आहे. हे ऐकून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण त्यांच्या कारकिर्दीत बांधकाम कामगार मंडळावर नियुक्त केलेले शासकीय सदस्य कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत एका गुन्ह्याखाली फरारी होते, तरीही कारभार सुरु होता, याला काय म्हणायचे. या प्रकरणासह फडणवीस यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीतील कारभाराची चौकशी करावी अशी मागणी गृहमंत्र्यांकडे करू असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक बिहार, बंगालची बदनामी मात्र महाराष्ट्र सरकारची
बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुशांतसिंगचा विषय तर बंगालची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रिया चक्रवर्तीचे प्रकरण चर्चेत आणले जात असल्याचा आरोप तेथिल विरोधी नेत्यांनी केला आहे. परंतु हे दोन्ही विषय बाहेरचे असून यात नाहक बदनामी महाराष्ट्राची केली जात आहे, असा टोला मंत्री मुश्रीफ यांनी लगावला