प्रतिनिधी/ सातारा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आकसाने, बेकायदा बजावलेल्या 160 च्या नोटीसीबाबत महाविकास आघाडीच्या नावाने भाजपाने जिह्यात होळी साजरी केली. जिह्यातील सातारा शहरासह प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नोटीस जाळण्याचा कार्यक्रम पार पडला. सरकारच्या नावाने बोंब ठोकत हे आंदोलन करण्यात आले. सातारा शहरातील पोवई नाक्यावर पोलिसांनी नोटीसा हिसकावून घेतल्या.
पोवई नाक्यावरील आंदोलनात जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, ऍड. प्रशांत खामकर, चिटणीस विजय गाढवे, सुनील जाधव, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, जयदीप ठुसे, तालुका सरचिटणीस गणेश पालखे, चित्रपट आघाडी जिल्हाद्यक्ष विकास बनकर, भटके विमुक्त आघाडी महिला जिल्हाध्यक्ष प्रिया नाईक, किसान मोर्च्या तालुका अध्यक्ष हेमंत शिंदे, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, प्रशांत जोशी, तालुका उपाध्यक्ष सुभाष माने, शहर चिटणीस रवी आपटे, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष युवा मोर्च्या अध्यक्ष विक्रम बोराटे, विक्रम पवार, अविनाश खर्षिकर, शिक्षक आघाडी तालुका अध्यक्ष संतोष सुतार, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष संजय कासट, सोशल मीडियाचे अभिजित लकडे, चैतन्य जोशी, अक्षय इंगवले, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी या महाविकास आघाडी सरकारचे करायचे काय?, खाली मुंढी वर पाय, अरे दाऊद समर्थक सरकारचा निषेध असो, उद्धव ठाकरे यांचा निषेध असो, अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना विकास गोसावी म्हणाले, पोलीस ट्रान्सफर रॅकेट घोटाळा देवेंद्रजींनी उघड केल्याने, त्यांना सूड बुद्धीने नोटीस पाठवून बोलवण्यात आलं आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना नोटीस आली की, गायब होतात. पोटात दुखतं, नको तिथं दुखतं, घोटाळ्यात थेट सहभाग दिसतो म्हणून चौकशीला बोलावले की, राजकीय सूडबुद्धी असे तुणतुणे वाजवले जाते आणि घोटाळा झाल्याचे ज्यांनी उघड केले त्यांनाच दोषी असल्यासारखे चौकशीला बोलावले जाते. ही कुपोषित बुद्धी असलेल्या राज्य सरकारचा भाजपा पदाधिकाऱयांनी निषेध केला. राज्यशासनाच्या विरुद्ध बोंबाबोंब केली. विरोधी पक्ष नेत्याला नोटीस देऊन अपराध्यासरखें चौकशी साठी बोलावणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही , राज्य शासनाने ही नोटीस रद्द करून माफी मागावी, राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.