शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे टिकास्त्र
वैफल्यग्रस्त होऊन शिवसेना, नेत्यांवर टीका
..ते केसरकरांना उमेदवारी काय देणार?
सेनेच्या मेहेरबानीमुळे कणकवलीतून निवडून आले!
वार्ताहर / कुडाळ:
भाजपची राज्यातील सत्ता हातातून गेल्याने जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त होऊन शिवसेना व नेत्यांवर टीका करत आहेत. भाजपकडून स्वत:साठी आमदारकीची उमेदवारी ते आणू शकले नाहीत. ते माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना भाजपमधून उमेदवारी काय देणार? अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली. त्यावेळी कणकवलीतून ते शिवसेनेच्या मेहेरबानीमुळे निवडून आले, असा टोलाही त्यांनी लगावला.
केसरकर यांनी सेनेतील अपमान सहन करण्यापेक्षा आमदारकीचा राजीनामा द्यावा. भाजपच्या तिकिटावर त्यांना निवडून आणू, असे वक्तव्य जठार यांनी केले होते. त्याचा पडते यांनी आज येथील शिवसेना कार्यालयात समाचार घेतला. पं. स. माजी सदस्य अतुल बंगे व बाळा पावसकर उपस्थित हेते.
पडते म्हणाले, मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मुळात केसरकर नाराज नाहीत. पालकमंत्री उदय सामंत दोन दिवसांपूर्वी जिल्हा दौऱयावर आल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख व पालकमंत्री सामंत यांच्या एकत्रित सभा झाल्या. कुठल्याही सभेत केसरकर यांची नाराजी दिसली नाही. त्यांच्याबद्दलही कुणा नेत्याने नाराजी व्यक्त केली नाही.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या हिताचे चांगले निर्णय घेतले. जिल्हय़ाचे पालकमंत्री कोण व्हावेत हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे, असे पडते यांनी सांगून ‘चांदा ते बांदा’ योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. या योजनेचे दोनशे कोटी रु. जि. प. नियोजनकडे आले आहेत. त्या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. कुठल्याही स्थितीत ही योजना बंद होणार नाही, यासाठी पालकमंत्री सामंत यांच्यासह खासदार राऊत, आमदार केसरकर व आमदार नाईक प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही योजना बंद होणार नाही हे जठारांनी ध्यानात ठेवावे. सत्तेत असूनही सेनेने आंदोलने केली. जनतेसाठी रस्त्यावर उतरण्याची सेनेची तयारी असते. त्यामुळे ‘चांदा ते बांदा’ योजना बंद होणार नाही. त्याची काळजी जठारांनी करू नये, असा सल्ला त्यांनी दिला.
भाजपचे बरेच लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते येत्या सहा महिन्यांत शिवसेनेत येणार आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आता कोसळणार, उद्या कोसळणार, असे सांगून जठार त्या कार्यकर्त्यांना थोपवून ठेवत आहेत. सावंतवाडी मतदारसंघात जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा वापर मोठय़ा प्रमाणात होऊनही शिवसैनिकांनी मेहनत घेत केसरकर यांना निवडून आणले. केसरकर यांना पाच वर्षांपूर्वी सेनेतून निवडून आल्यानंतर मंत्रिपदाचा मान दिला. पक्षश्रेष्ठेंनी दिलेल्या जबाबदारीनंतर त्यांनी सिंधुदुर्गसाठी कोटय़वधीचा निधी दिला. जिल्हय़ातील भयग्रस्त वातावरण बदलले. कणकवली मतदारसंघात शिवसेनेला स्वबळावर 56 हजार मते मिळाली. सेना नेते, पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये जठार यांनी संभ्रम निर्माण करू नये. केसरकर यांनी मंजूर केलेली कामे उदय सामंत पूर्णत्वास नेतील, असे पडते यांनी सांगून महाविकास आघाडीतर्फे जिल्हा बँक निवडणूक लढविली जाणार आहे. यासंदर्भात तसेच थकीत खावटी कर्जासंदर्भात सहकाराशी संबंधित या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सतीश सावंत यांनी सातारा येथे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, असे ते म्हणाले.