भाजपसह मंत्री गडकरी यांच्यावर काँग्रेसचा हल्लाबोल
प्रतिनिधी / पणजी
गोव्यासह संपूर्ण देश विविध प्रकारच्या समस्यांच्या संकटात असताना गोव्यासाठी रु. 50 लाख रुपये खर्चुन ऑनलाईन सभा केल्याबद्दल काँग्रेस नेत्यांनी भाजपसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांचे भाषण म्हणजे खोटारडेपणाचा कळस होता. गोव्यातील एकाही ज्वलंत प्रश्नावर त्यांनी भाष्य केले नाही तसेच पॅकेज सांगितले नाही, अशा शब्दात काँग्रेसने गडकरींवर ठपका ठेवला.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, ऍड. रमाकांत खलप, आग्नेल फर्नांडिस या सर्वांनी भाजपवर कडक टीका करून त्यांचा चांगलाच समाचार घेतला. कोरोनाबाधित गोवा ग्रीन झोन मध्ये असून गोव्यातील खाणी सुरू झाल्याच्या थापा गडकरींनी मारल्या. नोटाबंदी, जीएसटीचा गोव्यातील लोकांना किती लाभ झाला यावर ते काही बोलले नाहीत. भारताचे 20 जवान शहीद झाले त्यावरही त्यांचे तोंड बंदच राहीले. देशातील लोक गरीब होत असून भाजप मात्र श्रीमंत होत असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला. ते रु. 50 लाख गोव्यातील गरीबांना दिले असते तर बरे होते, असे चोडणकर म्हणाले.
गोव्याची आर्थिक परिस्थिती बिकट असून जीएसटीची रु. 750 कोटींची भरपाई गोव्यासाठी येणे आहे. ती मिळत नाही आणि ती देण्यासाठी केंद्राकडे पैसे नाहीत. गोव्याचे हक्काचे पैसे मिळत नाहीत. रु. 20 लाख कोटीचे पॅकेज केंद्राने जाहीर केले. त्यातील किती रक्कम गोव्याला मिळणार याचा पत्ता नाही, असे कामत यांनी निदर्शनास आणले. गोव्यातील गरीब घटक तळमळत असून त्यांच्यासाठी रु. 100 कोटींचे पॅकेज द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केल्याची माहिती कामत यांनी दिली. त्याकडे सरकारने लक्ष दिले नाही, असे ते म्हणाले. पेट्रोल, डिझेल दरवाढ सातत्याने होत आहे. सरकारी योजना नीट चालत नाहीत. लाभधारकांना त्यांचे पैसे मिळत नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादईबाबत गडकरींनी एक शब्द काढला नाही. कर्नाटकाने पाणी पळवले व गोव्यावर अन्याय केला. या प्रकरणी काय केले ते सांगावे, अशी मागणी रमाकांत खलप यांनी केली. तसेच म्हादई प्रश्नावर अहवाल सादर करावा, असे त्यांनी सुचविले. गोवा राज्यातील अनेक बँका, सोसायटी संकटात असून त्यांच्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यांनाही पॅकेजची गरज आहे. गोव्यातील साखर कारखाना बुडीत निघाला आहे. राज्यातील शेतजमिनीची खुलेआम मोठय़ा प्रमाणात विक्री होत असून त्यावर नियंत्रण नाही. गोमंतकीयांची जमीन राखली नाही तर गोमंतकीय परके होतील. गोवा गोमंतकीयांच्या हातून निसटेल, अशी भीती ऍड. रमाकांत खलप यांनी प्रकट केली. गोव्यातील प्रश्नासाठी गडकरी यांनी पुन्हा ऑनलाईन सभा घेऊन उत्तरे द्यावीत, अशी मागणी खलप यांनी केली.
गोव्यातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला असून शॅक वाल्यांकडून डिपॉझिट म्हणून घेतलेली रक्कम त्यांना अद्यापही परत करण्यात आलेली नाही. तरी त्यांना परत देण्यात यावी, अशी मागणी आग्नेल फर्नांडिस यांनी केली. परप्रांतीयांना त्यांच्या गावात जाण्यासाठी काही मंत्र्यांनी पैसे घेतले असा आरोपही फर्नांडिस यांनी केला.
कोरोनाबाबत लोकांनी सावध रहावे
कोरोनाचा गोव्यात पहिला बळी गेला असल्याने आता लोकांनी सावध रहावे. सरकारवर अवलंबून न रहाता काळजी घ्यावी. कोरोनाचे आणखी बळी वाढू नयेत. हा एकच बळी शेवटचा ठरावा. सर्व कोविड रुग्ण बरे व्हावेत, अशी अपेक्षा दिगंबर कामत व गिरीश चोडणकर यांनी प्रकट केली.