ऑनलाईन टीम / मुंबई :
भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये तपास यंत्रणेंचा गैरवापर होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी आज केला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआयला तपास करता येणार नाही, असा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. हा निर्णय योग्य असल्याचेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र आहे, सीबीआय असेल, ईडी असेल यांना थोडेफार तपासाचे अधिकार आहेत. त्या अधिकारांचा गैरवापर, जिथे विरोधकांची राज्य आहेत, आपल्या विचारांची राज्य नाहीत त्यांना त्रास देण्यासाठी, बदनाम करण्यासाठी कोणी करत असेल तर नाईलाजाने राज्याच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. पश्चिम बंगालमध्ये हा प्रसंग आला आहे. आंध्रमध्येही आहे. अजून एकदोन राज्यामध्येही आहे. महाराष्ट्र शेवटचे राज्य आहे. संयमाचा बांध तुटल्याने, कडेलोट झाल्यानेच हा निर्णय झाला, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
मुंबई पोलिसांनी तपास करायला घेतला आणि अंतिम सत्यापर्यंत पोहोचले की ताबडतोब केंद्रीय तपास यंत्रणेकडे तपास जायचा. कुठेतरी वेगळ्या राज्यात गुन्हा दाखल करुन तपास हातात घेतात आणि मग महाराष्ट्रात घुसतात. हे किती काळ चालणार. शेवटी महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. राज्याचे मंत्रिमंडळ आहे, मुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत. येथील तपास यंत्रणाही तेवढ्या सक्षम आहेत.
दरम्यान, आतापर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याही प्रकरणात थेट चौकशी करण्याचे अधिकार सीबीआयला होते. पण आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सीबीआयला देखील परवानगी घ्याली लागणार आहे.