ऑनलाईन टीम / मुंबई :
ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपचे राज्यभरात चक्काजाम आणि जेलभरो आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत भाजपच्या अनेक नेत्यांना आणि आमदार, खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजपच्या आंदोलनावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली आहे. भाजपचे आंदोलन म्हणजे सौ चुहे खाके बिल्ली हज को चली असा प्रकार असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत आंदोलन करणार्या भाजपला ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे, अशा प्रकारे भाजप आंदोलनाची पाटील यांनी एकप्रकारे खिल्ली उडवली आहे.
अनिल देशमुख यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, राज्यामध्ये मागच्या काळात अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल नोंदवले गेले होते. त्यांनी गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. त्या आरोपपत्राचा वापर करून किंवा बाहेरुन आरोप करुन अनिल देशमुखांना अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्रीय एजन्सीकडून सुरू आहे.
पुढे ते म्हणाले, अनिल देशमुख यांच्यावर यापूर्वी सीबीआयने धाडी टाकल्या होत्या त्यात त्यांना काही सापडले नाही. म्हणून आठ – दहा वर्षापूर्वीचे जुन्या गोष्टी उकरून काढून त्या त्रुटींवर बोट ठेवून अनिल देशमुख यांना पुन्हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न ईडीमार्फत होत असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला आहे.