प्रतिनिधी / चिपळूण
महाविकास आघाडीने आता आपला मोर्चा उपनगराध्यक्षपदाकडे वळवला आहे. त्यामुळे भाजपचे हे पद अडचणीत येण्याची शक्यता आहे. या पदावर असलेल्या निशिकांत भोजने यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी आघाडीने गुरूवारी नगराध्यक्षांकडे निवेदनाद्वारे विशेष सभेची मागणी केली आहे. त्यामुळे आता नगर परिषदेतील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
पावणेचार वर्षापूर्वी नगर परिषदेची निवडणूक झाल्यावर येथे भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली, तर अधिक जागा मिळूनही शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागले. सत्ता स्थापन करताना नगराध्यक्षा सुरेखा खेराडे या जनतेतून निवडून आल्याने या पदावर अन्य कोणी दावा करण्याचा पश्न नव्हता. मात्र उपनगराध्यक्षपदाच्या वाटण्या करण्यात आल्या होत्या. त्यानुसार सुरूवातीला हे पद भाजपचेच नगरसेवक निशिकांत भोजने यांना देण्यात आले. त्यानंतर ते काँगेसच्या सुधीर शिंदे यांच्याकडे जाणार होते. मात्र ठरल्याप्रमाणे भोजने यांनी या पदाचा अद्यापही राजीनामा दिलेला नाही. याबाबत सुरूवातीपासून मित्र पक्षांमध्ये नाराजी होती.
असे असताना आता राष्ट्रवादी व काँग्रेसने भाजपला बायबाय करीत सेनेशी हातमिळवणी केली आहे. त्यांची महाविकास आघाडी स्थापन झाल्याने काही महिन्यांपूर्वी झालेल्या विषय समित्या या आघाडीकडे गेल्या आहेत. हे यश मिळाल्यानंतर आघाडीने मुख्य खुर्ची असलेल्या नगराध्यक्षपदालाच लक्ष्य केले आहे. नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यावर आरोप करीत त्यांना बडतर्प करण्याची मागणी जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे. त्याची चौकशी सुरू असतानाच आता पावणेचार वर्षे आशेवर ठेवलेल्या उपनगराध्यक्ष पदावर आपला नेम धरला आहे.
भोजने यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी खेराडे यांना निवेदन देऊन विशेष सभेची मागणी करण्यात आली आहे. आघाडीकडे बहुमत असल्याने व अविश्वास ठराव आणण्याची पूर्ण तयारी आघाडीने केली असल्याने भोजने यांना या पदावरून पायउतार व्हावे लागण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नगर परिषदेतील राजकीय वातावरण तापणार असून या आगीत काही महिन्यांसाठी का होईना उपनगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सभेच्या मागणी निवेदनावर शिवसेनेचे गटनेते उमेश सकपाळ, काँग्रेसचे गटनेते सुधीर शिंदे, राष्ट्रवादीचे गटनेते बिलाल पालकर, नगरसेवक मोहन मिरगल, शशिकांत मोदी, राजेश केळसकर, कबीर काद्री, करामत मिठागरी, संजीवनी शिगवण, सीमा रानडे, फैरोझा मोडक, वर्षा जागुष्टे, शिवानी पवार, स्वाती दांडेकर, मनोज शिंदे, सफा गोठे, भगवान बुरटे, सुषमा कासेकर, सुरय्या फकीर, संजीवनी घेवडेकर, सई चव्हाण या 21 जणांच्या सह्या असून केवळ जयश्री चितळे यांची सही नाही.