सर्वांवर मात करत सावंत सरकारने निवडणूक जिंकली, त्याची सविस्तर, सम्यक, तटस्थ कारणमिमांसा व्हायला हवी तसेच दुसऱया बाजूने बहुमत असूनही निकालांनंतर लगेच सरकार, मंत्रिमंडळ स्थापन करण्यात भाजपला जे अपयश आले, त्याचा भाजपने गांभीर्याने विचार करायला हवा, कारण त्यामुळे राज्याचे नुकसान झाले आहे.
भारतीय जनता पार्टी गोव्यात सलग तिसऱयांदा सत्ता मिळविण्यात यशस्वी झाली. भाजपने मिळविलेले हे यश अनेकांना अनाकलनीय वाटते आहे. या निकालांनी अनेकांचे मनसुबे धुळीस मिळविले खरे! मातब्बर गणले जाणारे राजकीय तज्ञ तसेच स्वतःचे मत मांडताना देखील ज्यांना भीती वाटते त्या मताला ‘राजकीय अभ्यासकांचे मत’ म्हणून नोंदविणारे अशांचे निवडणूक अंदाज बाद ठरवत डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजपने बहुमत मिळविले. ‘अँटी इनकंबन्सी फॅक्टर’ लक्षात घेतल्यास सलग तिसऱयांदा सत्ता मिळणे तसे दुरापास्त असते. मात्र एका पेक्षा एक अशा विरोधकांनी रचलेला चक्रव्यूह भेदून भाजपचा हा अभिमन्यू त्यातून सहीसलामत विजयी होऊन बाहेरही पडला. विरोधकांमध्ये एकेकाळचा साथीदार मगो होता. तृणमूल काँग्रेससारखा आक्रमक पक्षही प्रथमच भाजपसमोर आला होता. भाजपमधील काही घरभेदीही कार्यरत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाडण्यासाठीही म्हणे कटकारस्थाने रचण्यात आली, कोटय़वधींचा पैसाही वाहिला गेला. या सर्वांवर मात करत सावंत सरकारने निवडणूक जिंकली, त्याची सविस्तर, सम्यक, तटस्थ कारणमिमांसा व्हायला हवी तसेच दुसऱया बाजूने बहुमत असूनही निकालांनंतर लगेच सरकार, मंत्रिमंडळ स्थापन करण्यात भाजपला जे अपयश आले, त्याचा भाजपने गांभीर्याने विचार करायला हवा, कारण त्यामुळे राज्याचे नुकसान झाले आहे.
गोव्यातील राजकीय परिस्थितीचा ज्याने निष्पक्ष विचार केला होता, कुणाशीही नातेसंबंध न राखता राज्यशास्त्रानुसार अभ्यास केला होता, सत्ताधारी भाजपच्या बलस्थानांचा विचार केला होता, विरोधी काँग्रेसबाबत मतदारांमधील विश्वासर्हतेचे प्रमाण-पुर्वानुभव, मगोची धरसोड वृत्ती, आप व तृणमूल काँग्रेसला मतदार कोणत्या दृष्टीने पाहतात, त्यांनी केलेल्या घोषणा या सर्वांचा विचार ज्याने केला होता, आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे या सर्वांत कुणाचे संघटन मजबूत आहे, कोणाचा मतदारांशी सलग संपर्क आहे, याचा ज्याने विचार करुन निवडणूक निकालांचे अंदाज बांधले होते, त्यांना प्रत्यक्ष निकाल पाहून कोणताच अचंबा वाटणार नाही. राष्ट्रीय स्तरांवरील निवडणूक सर्वे, एक्झिट पोल वगैरे फोल ठरले. ‘आरबीएन’चे अंदाज 95 टक्के खरे ठरले. अजून कोणी भाजपने मतदान यंत्रे (इव्हिएम) फिरविली, अशी मुक्ताफळे उधळून भारतीय निवडणूक आयोगावर आळ घेतलेला नाही.
भाजपच्या यशामागे जशी अनेक कारणे आहेत, तशी विरोधकांच्या अपयशामध्येही कारणे आहेत. कोणत्याच पक्षाचा चष्मा न वापरणाऱयांना ती सुस्पष्ट दिसतात. साधारणपणे सात-आठ महिन्यांपूर्वी सरकारच्या विरोधात वातावरण तापविण्यात विरोधकांना चांगलेच यश आले होते. पण त्याचे रुपांतर मतांमध्ये तेवढे झाले नाही. याचे कारण सारी मदार केवळ पत्रकार परिषदांवर होती. सरकार विरोधात अनेक आंदोलने झाली, ती पाहता सरकार धोक्यात आहे, हे लक्षात येत होते. पण या आंदोलनांचा परिणाम स्थानिक जागीच प्रभाव जाणवला. उदा. मेळावली, वास्को आंदोलन. मोपा आंदोलनाचा तर स्थानिक मतदारसंघातही प्रभाव जाणवला नाही. कोरोना काळात शंभर टक्के कार्य कोणतेच सरकार करु शकले नसते. गोव्यात अनेकांचे बळी गेले, तरीही सरकार व आरोग्य खात्यातील लोकांनी अनेकांचे जीवही वाचविले. ज्यांचे बळी गेले त्यांच्या नातेवाईकांपेक्षा राजकारण्यांनीच अधिक आराडाओरडा केला. ज्या आरोग्य खात्याने काही लोकप्रतिनिधींना कोरोनातून बाहेर काढण्यात यश मिळविले तेच लोकप्रतिनिधी नंतर डॉक्टर्स, नर्सना खासगीत धन्यवाद द्यायचे आणि जाहीरपणे मात्र आरोग्य खात्यावर टीका करायचे, हे वास्तव डॉक्टर्स, नर्सनी अनुभवले. सरकार काही ठिकाणी कमी पडले. पण त्याचबरोबर ‘भिवपाची गरज ना’ असा धीर देत सावंत सरकारने शक्य तेवढे केले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता लोकांना मदतीचा हात दिला. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनीही उल्लेखनीय कार्य केले. अन्य काहीजणांनीही केले होते, त्यातील बरेचजण निवडणुकीच्या काळात टिएमसीमध्ये गेले होते. टिएमसीच्या प्रतिमेकडे पाहून लोकांनी अशा अनेकांकडे दुर्लक्ष केले. अन्यथा त्यांच्याकडे केवळ उमेदवार म्हणून पाहत त्यांना मते दिली असती तर आज टिएमसीही विधानसभेत प्रवेशकर्ता झाला असता. विरोधकांची जमेची बाजू म्हणजे मोठमोठी जादुई, अफलातून आश्वासने दिली, त्या तुलनेत भाजपने तीन एलपीजी सिलींडर मोफत याशिवाय अन्य कोणते जादुई आश्वासन दिले नाही. ही आश्वासने पाहून आपण मत दिले म्हणून आपल्याला त्याचा लाभ होणार नाही, तर त्यासाठी त्या पक्षाचे एकवीस आमदार निवडून यायला हवे, सत्ता यायला हवी, आणि सत्ता येणे तसे सोपे नाही, हे न कळायला गोव्यातील मतदार अज्ञानी नाहीत. जे वादग्रस्त मुद्दे होते त्या सर्वांना यंदा भाजपने कुणाच्याही ध्यानीमनी येऊ न देता सोयीस्कर बगल दिली. भाजपने निवडणुकीपुर्वी नोकऱया जाहीर केल्या आणि त्यांच्या नियुक्त्या मात्र मोठय़ा चातुर्याने रोखून धरल्या. कुणीही काहीही म्हटले तरी नोकरी, पैसा खूप महत्वाचा असतोच ना! संघटनशक्तीबाबत अजूनही नंबर वन राहिला हे खुल्या मनाने मान्य करायला हवे. एकेकाळी मगो, काँग्रेसकडेही पक्षासाठी जीवाचे रान करणारे कार्यकर्ते होते. कंपन्या पक्षाला विजयी करु शकल्या असत्या तर कॉस्मेटिक, मोबाईलच्या सर्व कंपन्या बंद पडून त्यांनी पक्ष चालविण्याच्या कंपन्या सुरु केल्या असत्या. प्रत्येक विकासकामाला विरोध करणाऱया पक्षांना मतदारांनी पाहिले होते. विरोधी पक्षांमध्ये एकजूट नव्हतीच, पण प्रत्येक पक्ष स्वतःमध्ये तरी कुठे एकजूट, मजबूत होता? काँग्रेस सतरावरुन एकटे दिगंबर कामतपर्यंत आले. मगो, गोवा फॉरवर्डचेही तेच. रिव्होल्युशनरी गोवन्स, आपमध्ये एकजुट आणि शिस्त होती. विरोधकांच्या या फुटीचा फायदा भाजपला मिळणार नाही, असे ज्यांना वाटत होते त्यांचेच निकालाचे अंदाज चुकले. स्वतःचे ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यात भाजप अपयशी ठरला, ही मनोहर पर्रीकर नसलेल्या निवडणुकीची खास नोंद आहे. मात्र भाजप आमदार गोळा करत होता, किंवा आमदार बनू शकणारे उमेदवार गोळा करत होता, तेव्हा बाकीचे पक्ष कार्यकर्ते शोधत होते किंवा भाडोत्री कार्यकर्ते काम करत होते, ज्यांना गोव्याच्या मतदारांच्या भावनांचा काहीही थांगपत्ता नव्हता. म्हणून निकालानंतर त्यांच्या आणि तटस्थपणे निवडणुकीकडे न पाहिलेल्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले ‘अजीब है गोवा के लोग’!
राजू भिकारो नाईक