नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे शनिवारी निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कल्याण सिंह हे चार जुलैपासून लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल होते. अवयव निकामी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा पाळला जाणार असून, 23 ऑगस्टला सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात माहिती देताना, “कल्याण सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला जाईल. त्यांच्यावर 23 ऑगस्टला सायंकाळी नरोरा येथे गंगा नदीच्या किनाऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तसेच, 23 ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी असेल,” असे म्हटले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कल्याण सिंह यांची प्रकृती अधिक चिंताजनक बनली होती. दरम्यान, शुक्रवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट घेतली. कल्याण सिंह हे राजस्थानचे राज्यपाल देखील होते. याशिवाय, ते भाजपचे संस्थापक नेते होते. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून अनेक ज्येष्ठ नेते त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले होते. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांनी कल्याण सिंह यांच्या निधनाबद्दल दु: ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून म्हटलं की, “मी खूप दु: खी आहे. कल्याण सिंह जी… एक राजकारणी, अनुभवी प्रशासक, तळागाळातील नेते आणि एक महान व्यक्ती होते. उत्तर प्रदेशच्या विकासात त्यांचे अमूल्य योगदान आहे. मी त्यांचा मुलगा राजवीर सिंह यांच्याशी बोललो आणि शोक व्यक्त केला. ओम शांती.”