ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
1988 नंतर भाजपने पहिल्यांदाच राज्यसभेत शतक गाठलं आहे. भाजप खासदारांची संख्या 97 होती. नुकतीच 13 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यात भाजपचे 3 खासदार निवडून आले. त्यामुळे भाजपने 33 वर्षानंतर पहिल्यांदाच राज्यसभेत तीन आकडी संख्या गाठली आहे. तर दोन नंबरवर असलेल्या काँग्रेसची सदस्यसंख्या राज्यसभेत 33 आहे.
राज्यसभेच्या सदस्यांची संख्या 245 असते. यावेळी भाजपने 100 जागांवर स्थान मिळवले आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे ईशान्य भारतातून राज्यसभेवर काँग्रेसचा एकही सदस्य नाही. ईशान्य भारतातील राज्यांतून राज्यसभेवर एकूण 14 जागा आहेत. त्यापैकी 13 जागा भाजपकडे आहेत. तर आसाममधील एक जागा अपक्ष उमेदवार अजित कुमार भुया यांच्याकडे आहे.
1952 साली काँग्रेसचे राज्यसभेत 146 सदस्य होते तर भाजपचा एक सदस्य होता. 1962-64 मध्ये काँग्रेस 162 तर भाजप 4, 1972-74 मध्ये काँग्रेस 128 तर भाजप 14, 1982-84 मध्ये काँग्रेस 152 तर भाजप 17, 1988-90 मध्ये काँग्रेस 108 आणि तर भाजप 17, 1990-92 मध्ये काँग्रेस 99 तर भाजप 45, 2012-13 मध्ये काँग्रेस 72 तर भाजप 47 आणि आता 2022 मध्ये काँग्रेस 29 तर भाजप 100 अशी स्थिती आहे.
दरम्यान, एप्रिल ते जुलै या तीन महिन्यांच्या काळात राज्यसभेचे तब्बल 72 सदस्य निवृत्त होत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या सहा खासदारांचा समावेश आहे.