ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह परिसरातील मराठी माणुस आणि परप्रांतीय हा वाद पुन्हा एक चव्हाट्यावर आला आहे. याला निमित्त ठरले ते ठाण्यातील सहाय्यक आयुक्तांवरील हल्ला आणि साकीनाका बलात्कार प्रकरण याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपाचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील! त्यांचे वागणे, बोलणे व डोलणे यावरुन तसेच दिसत आहे. असं ही ते यावेळी म्हणाले.
याच विषयावर भाष्य करताना राऊत यांनी मुंबई हा विषय केवळ राज्याचा राहिला नाही. तो देशव्यापी झाला आहे. भूमिपुत्रांचा लढा व परप्रांतीयांची समस्या हे दोन्ही वेगळे विषय आहेत. मुंबईच्या साकीनाका परिसरात बलात्कार करणारा आरोपी मोहन चौहाण हा उत्तर प्रदेशातून येथे आलेला आहे. ठाण्यात पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणारा अनधिकृत फेरीवालाही बाहेरचाच होता. त्यामुळे वादंग माजले आहेत. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडलेल्या भुमिकेला राजकिय पक्षांनी विरोध करण्याऐवजी या भूमिकेचे स्वागत करायला हवे.
कारण महाराष्ट्रात जगभरातून जे लोंढे वाहत येतात, ते कोठे काम करतात, कोठे राहतात यांची नोंद कोठे ना कोठे असायलया हवी. यामूळे मुंबईसारख्या शहरातील वातावरण शुद्ध राहाण्यास मदत होईल. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडित अशी ही भूमिका आहे, पण भारतीय जनता पक्षाने यावर आंदोलन सुरू केले असल्याचे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.