मुंबई/प्रतिनिधी
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलं आहे. बंगालमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला असला तरी टीएमसीच्या प्रमुख ममतांचा भाजप उमेदवाराने पराभव केल्याने भाजप भलतीच खुश आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराविरोधात ५ मे रोजी भाजपाने देशव्यापी धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर तृणमूल काँग्रेसकडून हिंसाचार करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. भाजपा नेते आणि समर्थकांकडून पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचे व्हिडीओ शेअर करत राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करत आहेत. दरम्यान शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपाच्या आंदोलनाच्या पवित्र्यावर टीका केली आहे.
खासदार प्रियंका चतुर्वैदी यांनी भाजपच्या नियोजित ५ मे रोजीच्या आंदोलनावरुन ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. देशाने अजून करोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव पाहिलेला नाही, त्यामुळे भाजपानुसार अशा सुपर स्प्रेड धरणे कार्यक्रमांची गरज आहे.नाही का? असा टोला त्यांनी लगावला आहे.
निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु असून भाजपासहित इतर पक्षांनाही तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. हिंसाचारात ११ जणांचा मृत्य झाला असून केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधी सविस्तर अहवाल मागवला आहे. दरम्यान भाजपाने करोनासंबंधित नियमांचं पालन करुन ५ मे रोजी देशव्यापी आंदोलन केलं जाईल असं जाहीर केलं आहे.