वाढत्या हत्यांचा निषेध : कोलकात्यात रस्त्यावर हिंसक संघर्ष, पोलिसांचा निदर्शकांवर लाठीमार
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारविरोधात गुरुवारी भाजपने रस्त्यावर उतरुन तीव्र प्रदर्शन केले. भाजपचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या नेतृत्वात राज्यभर ‘नबाना चलो’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांना अडविण्याचा प्रयत्न पोलीस दलाकडून झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते विरुद्ध पोलीस प्रशासन असा संघर्ष निर्माण झाला. वाढलेल्या तणावामुळे पोलिसांना लाठीमार आणि पाण्याच्या फवाऱयांचाही वापर करावा लागला. मात्र, पोलिसांच्या अडवणुकीमुळे संतप्त झालेल्या भाजप आंदोलकांनी ममता बॅनर्जी सरकारवर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केल्यामुळे आता शाब्दिक युद्धालाही धार आली आहे.
कोलकात्याच्या रस्त्यावर गुरुवारी भाजपा कार्यकर्ते आणि पश्चिम बंगाल पोलिसांमध्ये संघर्ष झाला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या भाजपच्या मोर्चाला पोलिसांनी बॅरिकेड्स लावून अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर या हिंसक संघर्षाला सुरुवात झाली. कोलकाता आणि हावडामध्ये हजारो भाजप कार्यकर्ते राज्यातील बिघडत चाललेल्या कायदा सुव्यवस्थेविरोधात नबाना (हावडामधील एक ठिकाणी) मार्च काढला. हावडा जिल्हय़ातील संत्रागच्ची येथे भाजप कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा जोरदार फवारा मारण्यात आला. तसेच अश्रूधुराच्या नळकांडय़ाही फोडण्यात आल्या. पोलिसांनी कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी हावडाच्या संतरागाछीजवळ वॉटर कॅननचा वापर केला. यात पक्ष उपाध्यक्ष राजू बॅनर्जी आणि खासदार ज्योतिर्मय महतो जखमी झाले. कोलकाताच्या हेस्टिंग्ज परिसरातही पोलिसांनी लाठीभार केला. या आंदोलनावेळी राज्यात होत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आम्ही शांतीपूर्ण पद्धतीने आंदोलन करत होतो, पण ममता बॅनर्जी यांनी या आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी गुंडासोबत मिळून आमच्यावर दगडफेक केली, असा आरोप भाजपचे बंगालमधील प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे.
राज्यातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेचा निषेध नोंदवण्यासाठी गुरुवारी दुपारी कोलकाता, हावडा येथून हजारो भाजप कार्यकर्ते नबानाच्या दिशेने जात असताना पोलीस आमच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करत होते. खिदीरपूरच्या बाजूने दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी ते पाहिले नाही का?’’ असा सवाल भाजप नेते लॉकेट चटर्जी यांनी विचारला आहे.