मुंबई/प्रतिनिधी
देशात नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रा सुरु आहेत. महाराष्ट्रातही नवीन केंद्रीय मंत्र्यांच्या राज्यात जनाशीर्वाद यात्रा सुरु आहेत. या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे सांगण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी जमाव बंदी असतानाही गर्दी केली जात आहे. तसेच काही ठिकाणी यात्रेच्या आयोजकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या यात्रेच्या निमित्ताने कोरोनाचे नियम शासकीय अधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र आहे. कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत मास्क न लावता अनेक जण वावरताना दिसत आहेत. यावर आता राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोना वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.
“केरळमध्ये उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आल्यानंतर त्याचा फटका बसला आहे. देशपातळीवर सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या केरळमध्ये आहे. महाराष्ट्राने महाराष्ट्राचं काम केलं पाहिजे. पण एकीकडे केंद्र सरकार कोरोनाबाबत लक्ष द्या असे सांगत असून नवीन चार मंत्री झाले त्यांना यात्रा काढायला सांगत आहेत. ज्या ठिकाणी यात्रा निघाल्या तिथे गर्दी झाली त्याचा फटका बसल्याचे काही दिवसातचं आपल्याला दिसेल. तिथे कोरोना रुग्णसंख्या वाढू नये या मताचे आम्ही आहोतचं पण रुग्णसंख्या वाढली तर त्याला कोण जबाबदार याचाही विचार केंद्राने केला पाहिजे,” असे अजित पवार म्हणाले.