बेरोजगारी, महागाई, कचरा समस्या, भ्रष्टाचार हे भाजप सरकारचे ‘नरकासुर’ असल्याची टीका
प्रतिनिधी /मडगाव
बेरोजगारी, महागाई, कचऱयाची समस्या, भ्रष्टाचार आणि इंधन दरवाढ हे भाजप सरकारचे ‘नरकासुर’ असल्याचे सांगत गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी अशा नरकासुरांवर विजय मिळवण्यासाठी ‘संपूर्ण क्रांती’ची गरज असल्याचे म्हटले आहे.
फातोर्डा येथे श्रीकृष्ण विजयोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना सरदेसाई म्हणाले की, वाईट शक्तींना आळा घालण्यासाठी गोमंतकीयांनी सतर्क राहण्याची गरज आहे. या भाजप सरकारने कशा प्रकारे समस्या निर्माण केल्या आहेत आणि लोकांना त्रास दिला आहे याची जाणीव करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण सर्वांनी संघटित होऊन या नरकासुरांवर विजय मिळवण्याची गरज आहे. आम्ही आमच्या गोवा व गोमंतकीयत्वाचे रक्षण करणे देखील आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
यावेळी गोमंतक मराठा समाजाचे अध्यक्ष आनंद वाघुर्मेकर, मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष लिंडन पेरेरा, नगरसेवक आदी उपस्थित होते. फातोर्डा युवाशक्ती आणि विजय सरदेसाई यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. सरदेसाई म्हणाले की, विरोधी पक्षात असूनही मडगाव पालिकेने फातोर्डामध्ये बायोमिथेनेशन प्लांट स्थापित केला आहे, ज्यामध्ये पाच टीपीडी (प्रतिदिन टन) कचऱयावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. एसजीपीडीए मार्केटमध्ये तयार होणारे अन्न, मासे, मांस आणि भाजीपाला यांच्या कचऱयावर प्रक्रिया करणे आता शक्मय झाले आहे. कचरा हा दुसरा नरकासुर आहे. त्यामुळे आम्ही त्यावर उपाय योजले आहेत, असे त्यांनी सांगितले. भाजपने अडथळे निर्माण केले नाहीत, तर आम्ही सोनसडा येथे आणखी प्लांट्स आणू. कारण मडगावातच असा 35 टन कचरा निर्माण होतो, असे सरदेसाई म्हणाले.
निवडणुका हरल्याने पेट्रोल दरात कपात
सरदेसाई म्हणाले की, गेल्या वर्षभरात मोदी सरकारने पेट्रोलवर 28 रुपयांची वाढ केली आणि आता इतर राज्यांतील निवडणुका हरल्यानंतर लोक त्यांच्या विरोधात गेल्याचे त्यांना कळले आहे. त्यामुळे भाजपने पेट्रोलचे दर कमी करण्याची घोषणा केली आहे. भाजप सत्तेत राहिल्यास पेट्रोलचे दर 200 रुपयांपर्यंत पोहोचणार नाहीत याची खात्री कोणीही देऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
सरदेसाई म्हणाले की, लोकायुक्तसारख्या घटनात्मक संस्था आणि माजी राज्यपालांनीही प्रमोद सावंत सरकारला भ्रष्ट असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. गोव्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपला पक्ष काम करत आहे. आम्हाला बदल हवा आहे आणि तो साध्य करण्यासाठी तसेच भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी आम्ही पर्याय आणि उपाय देऊन लोकांना जागरूक करत आहोत, असे ते म्हणाले.
समविचारी पक्षांनी एकत्र यावे
भाजपला पराभूत करण्याचा अजेंडा असलेल्या समविचारी पक्षांनी संपूर्ण क्रांतीसाठी एकत्र यावे, असे ते म्हणाले. हे ध्येय साध्य करण्यासाठी मी काहीही त्याग करण्यास तयार आहे, असे सरदेसाई यांनी यावेळी सांगितले. वाघुर्मेकर यांनी यावेळी बोलताना विजय सरदेसाई आणि फातोर्डा युवाशक्ती यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. स्पर्धेचे विजेते असे आहेत ः प्रथम-साई युवक मंडळ, द्वितीय-भवानी हौशी मंडळ, तृतीय-ओंकार हौशी मंडळ, चौथे-श्रीकृष्ण कला मंडळ, पाचवे-नागेशी यूथ, नागेशी, सहावे-मारुदेव बांदोडा. बालकृष्ण-बाल मंडळ आकें, साई युवा मंडळ, श्रीकृष्ण हौशी मंडळ. संगीत-साई युवा मंडळ, भवानी हौशी मंडळ, नागेशी यूथ.