राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आत्तापर्यंत दोन मंत्र्यांना राजीनामे देऊन घरी जावे लागले त्यात एक शिवसेनेचे संजय राठोड तर दुसरे राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांचा समावेश आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे 12 जण आपल्या रडारवर असल्याचे सांगतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी 127 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केल्याने भाजपच्या रडारवर शिवसेनेबरोबर राष्ट्रवादीही असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांचे वांद्रे पूर्व येथील कार्यालय लवकरच तोडण्यात येणार आहे. याबाबत लोकयुक्तांनीच आदेश दिल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी अनिल परब यांच्या कार्यालयावर तोडण्याची कारवाई होणार आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानुसार त्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. याप्रकरणी चौकशी करून अनधिकृत बांधकाम तोडून संबंधित जागा नागरिकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती त्यांनी याचिकेद्वारे केली. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. त्यावेळी लोकायुक्तांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती रविवारी सोमय्या यांनी दिल्यानंतर दुसऱयाच दिवशी राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर करोडो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करताना सोमय्या यांनी शिवसेनेचे अनिल परब, आमदार प्रताप सरनाईक, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार यामिनी जाधव, महापालिकेतील नेते यशवंत जाधव, माजी मंत्री रवींद्र वायकर, माजी खासदार भावना गवळी, उध्दव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ भाजपच्या रडारवर असल्याचे सांगितले जाते. मात्र सोमय्या यांनी ही नावे जाहीर करताना त्यात एकही काँग्रेसचा नेता नाही. यापूर्वीही भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या एका मंत्र्याला घरी जावे लागले मात्र काँग्रेसच्या मंत्र्यांबद्दल भाजपला सॉफ्ट कॉर्नर असल्याचे दिसुन आले आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तर राज्य आणि केंद्राच्या राजकारणात नाहक आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला त्रास होत असल्याचे सांगत शिवसेनेने भाजपशी युती करावी असे पत्रच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहीले होते, तर मिलिंद नार्वेकर यांनी स्वतःच मुरूड येथे अनधिकृतपणे बांधलेल्या बंगल्याचे बांधकाम पाडले होते, आता सरनाईक आणि नार्वेकर यांच्यानंतर अनिल परब यांचा पाय अधिक खोलात जाण्याची शक्यता असून वांद्रे येथील कार्यालय तसेच दापोली येथील रिसॉर्टवरुन परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका बघता महापौर किशोरी पेडणेकर, पालिकेतील शिवसेनेचे हेवीवेट नेते यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांना भाजपकडून टार्गेट केले जाणार यात शंका नाही.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येतील तस तसे हे आरोप प्रत्यारोप वाढणार असून गेल्याच आठवडय़ात भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी कोस्टल रोडच्या भ्रष्टाचारात शिवसेनेची भागिदारी असल्याचा आरोप करताना यात 1 हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करताना एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. एकीकडे मुंबईतील साकीनाका येथे गणेशोत्सवाच्या काळात बलात्काराची अमानुष घटना घडते, राष्ट्रीय महिला आयोग राज्य सरकारवर ताषेरे ओढताना सरकारच्या गांभीर्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करते त्यातच आम्ही सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही हे पोलीस आयुक्तांचे विधान हे निषेधार्ह आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्याने अद्याप कोणत्याच निर्णयाला गती मिळाल्याचे बघायला मिळत नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा राज्य सरकार करणार होते मात्र अद्याप याबाबतही पुढे काहीच झाले नाही. आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार शक्ती कायदा करणार होते या कायद्यात प्रामुख्याने महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये 21 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करुन खटला चालवून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत देण्यात येणार आहे तसेच महिलांवरील ऍसिड हल्ला आणि बलात्कारासारखा गुन्हा हा अजामीनपात्र केला जाणार आहे. मात्र अद्याप हा कायदा लागू करण्यात आलेला नाही, राजकारणी केवळ राजकारण करण्यात मश्गुल आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या काळात गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकीकडे कोरोनामुळे धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध आणलेले असताना दुसरीकडे लसीकरण मोहीम अशा कार्यक्रमांना सरकारने आणखी गती द्यायला पाहीजे होती. कोरोना लसीच्या पुरवठय़ाअभावी गणेशोत्सवाच्या काळात लसीकरण मोहीमेला सामाजिक कार्यक्रमाची जोड मिळायला हवी होती. ती कुठेही झाल्याचे बघायला मिळाली नाही. सर्वच बाबतीत राजकारण करायचे. कधी मंदीरे उघडण्याची मागणी करण्यावरुन रस्त्यावर उतरायचे. मात्र आजही सर्वसामान्य जनता कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेमुळे भयभीत आहे. सत्ताधारी आणि विरोधक आरोप प्रत्यारोपात व्यस्त आहेत. आज भाजपने राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केला. आता राष्ट्रवादी भाजपच्या नेत्यावर आरोप करेल यातच गेली जवळपास 2 वर्षे वाया गेली असून त्यात केंद्र आणि राज्य सरकार संघर्ष यामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. किमान आता तरी सत्ताधारी आणि विरोधक यांना सूडबुध्दीचे राजकारण बाजुला ठेवुन बुध्दीची देवता गणरायाने †िवधायक राजकारण करण्याची बुध्दी देवो, हीच प्रार्थना.
प्रवीण काळे