आपचे व्हेन्झी व्हिएगश यांचा आरोप
प्रतिनिधी /पणजी
सासश्टीत मतांचे विभाजन करून भाजपला विजय मिळवून देण्यासाठीच राष्ट्रवादीचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनी पक्ष बदलला असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष आणि बाणावलीचे नेते कॅप्टन व्हेन्झी व्हिएगश यांनी केला आहे.
स्वतःची हाव पूर्ण करण्यासाठी चर्चिल यांनी दीर्घ वाटाघाटीनंतर सर्वोच्च बोली लावणाऱया पक्षात प्रवेश केला आहे. चर्चिल यांचा हा शेवटचा न साध्य होणारा प्रयत्न आहे, कारण बाणावलीतील मतदारांनी त्यांना आधीच नाकारले आहे, असे व्हिएगश म्हणाले.
चर्चिल यांनी सदैव केवळ स्वार्थासाठीच काम केले. कोविडच्या काळात सामान्य नागरिकांसाठी काम करणारे आप होते आणि चर्चिल कुठेच दिसत नव्हते. बाणावलीतील पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांना कोणतीही मदत मिळाली नाही.
चर्चिल यांनी गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारला पाठिंबा दिला. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार असल्याने ते पक्षाच्या विधिमंडळ गटाचे 100 टक्के प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे विलीनीकरण वैध असल्याचा दावा करत टीएमसीत सामील झाले. चर्चिल हे केवळ बाणावलीच्या विनाशालाच नव्हे तर भाजपला साथ देवून तर संपूर्ण गोव्याच्या विनाशाला कारणीभूत आहेत असे व्हिएगश म्हणाले.
आमदार हा नागरिक आणि राज्य प्रशासन यंत्रणा यांच्यातील दुवा असतो. परंतु चर्चिल हे कधीच तो दुवा बनले नाहीत. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी कोणतेही काम केले नाही. याऊलट आप ने ’बाणावलीसाठी शैक्षणिक घोषणापत्र तयार करण्यासाठी ’आप शिक्षक पॅनेल’ सुरू केले आहे. राज्यात पहिल्यांदाच राजकीय पक्षाने मतदारसंघातील शिक्षण सुधारणा जाहीरनामा तयार करण्यासाठी एक संस्था तयार केली आहे, असे ते पुढे म्हणाले.
बाणावलीतील सध्याची लढाई भ्रष्ट राजकारणी आणि एक प्रामाणिक नवीन पक्ष, यांच्यात आहे. बाणावलीत लोक बदलासाठी प्रयत्नशील आहेत आणि ते ’आप’ला मतदान करतील, असा विश्वास व्हिएगस यांनी व्यक्त केला आहे.