प्रतिनिधी/ रत्नागिरी
भाजपच्या 40 वा वर्धापनदिन सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला. रत्नागिरीसह राजापूर, लांजा, देवरुख, संगमेश्वर या दक्षिण रत्नागिरी जिह्यात शिधावाटप, सकाळी न्याहरी वाटप असे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. कोरोना (कोव्हिड-19) या जागतिक संकटामध्येही भाजपने समाजाची सेवा करत वर्धापनदिन साजरा केला.
सकाळी जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी साळवी स्टॉप येथील झोपडपट्टीतील गरजूंना शिधावाटप केले. नंतर कर्तव्यावर असणार्या पोलिस कर्मचारी आणि शहर पोलिसांना नॅपकिन आणि ग्लुकोज डीच्या पाकिटाचे वितरण केले. कोरोनाच्या संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार ‘पंतप्रधान केअर फंड’साठी योगदान देण्याचे आवाहन ऍड. पटवर्धन यांनी कार्यकर्त्यांना केले.
या वेळी ऍड. पटवर्धन यांनी सांगितले, या वेळी ऍड. दीपक पटवर्धन म्हणाले की, 1980 साली 6 एप्रिल रोजी श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी, खा. लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची स्थापना झाली. आज भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र शासन, अनेक राज्यात सत्तास्थानी आहे. संघटना म्हणून भाजप देशात सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. सर्वात जास्त सभासद संख्या असलेला जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. वर्धापनदिनाचे औचित्य साधून आजपासून जिल्हा शासकीय रुग्णालयात सकाळी 100 जणांना नाश्ता देण्यात आला. हा उपक्रम सलग 8 दिवस राबवण्यात येणार आहे. याकरिता ज्येष्ठ पदाधिकारी राजन फाळके यांनी जबाबदारी स्वीकारली आहे.
वर्धापनदिनाचे औचित्य साधून कोरोनाविरुद्धच्या लढय़ात शासनासह भाजपही जनतेसाठी झटत आहे. गरजूना अन्न पुरवठा, शिधा वाटप, रक्तदान, प्रशासनाबरोबर समन्वय या कामात भाजपचे हजारो कार्यकर्ते पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कार्यरत आहेत. 538 मंडलात हे सेवा कार्य सुरू आहे. आज सर्व तालुका अध्यक्ष, नगरसेवक या सेवाकार्यात सहभागी झाले. जिल्हाध्यक्ष पटवर्धन यांनी 200 जणांना भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. तसेच सेवा कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत आजपर्यंत दोन हजार घरांपर्यंत शिधा वाटप आणि आठ हजार लोकांना मास्क वाटप केले. शिधा, मास्क, अन्न पुरवठा या गोष्टीही भाजपचे कार्यकर्ते गरजूपर्यंत पोचवत आहेत.