राहुल-प्रियंका हनुमानगढ येथे कधी जाणार
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानच्या हनुमानगढ येथे दलित युवकाची जबर मारहाण करत हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आता राजकारण तापू लागले आहे. भाजपनंतर आता याप्रकरणी काँग्रेसला घेरण्यासाठी बसप अध्यक्षा मायावतींनी जोरदार टीका केली आहे. मायावतींनी या घटनेची निंदा करत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनाच लक्ष्य केले आहे.
राजस्थानच्या हनुमानगढमध्ये दलिताची करण्यात आलेल्या हत्या अत्यंत दुःखद आणि निंदनीय आहे. हनुमानगढच्या या घटनेबद्दल काँग्रेस नेतृत्वाने मौन का बाळगले आहे? छत्तीसगड आणि पंजाबचे मुख्यमंत्री तेथे जाऊन पीडित कुटुंबाला 50 लाख रुपयांची मदत देणार का असा बोचरा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
योगी सरकारही लक्ष्य
उत्तरप्रदेशच्या लखीमपूर येथील घटनेवरून त्यांनी भाजपवर टीका केली आहे. लखीमपूर येथील हिंसेप्रकरणी केंद्रीय मंत्र्याच्या पुत्राचे नाव चर्चेत येणे भाजप सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. भाजपने मंत्र्याचा राजीनामा मागावा तरच तेथील पीडित शेतकऱयांमध्ये न्यायाची अपेक्षा निर्माण होऊ शकते असे विधान मायावती यांनी केले आहे.
हनुमागढप्रकरणी भाजप सक्रीय
राजस्थानच्या घटनेवरून भाजपने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. अशोक गेहलोतांसह राहुल गांधी आणि प्रियंका वड्रा, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी तसेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हनुमानगढ येथे कधी जाणार अशी खोचक विचारणा भाजपकडून करण्यात आली आहे.