प्रतिनिधी/कोल्हापूर
माझ्यासह माझ्या कुटुंबीयांवर आणि जावयांवर आर्थिक घोटाळ्यांचे खोटे आरोप म्हणजे नीतिमत्तेचा कडेलोटच म्हणावा लागेल. मागील अनेक प्रकरणांत सातत्याने मी त्यांच्या विरोधात आवाज उठवत असल्यामुळेच भाजपाकडून मला टार्गेट केले जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी मंत्री मुश्रीफ यांना भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जावयांच्याबाबत राज्यपालांकडे तक्रार केली असल्याचे सांगितले. याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, भाजपकडून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांच्याकडून मला बदनाम करण्याची मोहीम पूर्ण झाली आहे. आता कुटुंबीयांना बदनाम करायचे कारस्थान आहे. माझ्या जावयाला बदनाम करण्यात येत आहे. या नवीन कारस्थानाचा मी निषेध करतो. सोमय्या वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी दाखल करत आहेत, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, कोणाकडेही तक्रार करू देत. जे व्हायचे आहे, ते होऊन जाईल. पण भाजपच्या या दबावतंत्राला मी घाबरणार नसल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.