विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा टोला : कुडचडे व सांखळीत वेगवेगळा न्याय
प्रतिनिधी / मडगाव
गोव्यातील भाजप सरकारने कुडचडे-काकोडा नगरपालिकेत लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या नगराध्यक्षांविरुद्ध अवघ्या काही मिनिटांत अविश्वास ठराव दाखल करून एक नवा खालचा पायंडा घातला आहे. सांखळी नगरपालिकेत दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर मात्र भाजप सरकार 43 दिवसांचा अवधी घेत आहे. सत्तेसाठी हपापलेल्या भाजपने रामायणातून जबाबदारी व त्यागाची शिकवण घ्यावी, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
रामराज्याच्या पोकळ घोषणा करणाऱया भाजपने राज्यात आपल्या कर्माने रावणराज्य आणले आहे. आज सत्तेला चिकटून राहण्यासाठी भाजप सर्व नीतिमूल्ये पायदळी तुडवत आहे, अशी टीका कामत यांनी केली आहे. रामायणात श्रीरामांनी आपल्या पालकांचा आदेश मानून चौदा वर्षे वनवास स्वीकारला. त्याचबरोबर त्यांचे बंधू भरत यांनी राजसिंहासनावर बसण्यास नकार देत श्रीरामांच्या पादुकांची स्थापना करून राज्य चालविले. लोकशाहीत जनादेश हा पालकांच्या आदेशासमान असतो. रामायणातील ही शिकवण भाजपने घ्यावी, असा सल्ला कामत यांनी दिला आहे.
आज गोव्यात भाजपला सत्तेचे व्यसन जडले आहे. सत्ता मिळविण्यासाठी भाजप गैरमार्गांचा वापर करत आहे. काणकोण व कुडचडे-काकोडा पालिकांतील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर 6 पैकी 5 नगरपालिकांत आपला विजय झाल्याचा दावा करणाऱया भाजपचे खरे चित्र लोकांसमोर आले, असा दावा कामत यांनी केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व कायदामंत्री नीलेश काब्राल प्रतिनिधीत्व करत असलेल्या सांखळी व कुडचडे मतदारसंघात भाजपने लोकशाहीची हत्या केली आहे. नगरपालिका संचालनालयाने नवीन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीची अधिसूचना जारी करण्याआधीच अविश्वास ठराव कसा काय आणला जातो, असा प्रश्न कामत यांनी विचारला आहे. तसेच सांखळीत अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी 43 दिवसांचा अवधी कसा लागतो, असा सवाल त्यांनी केला आहे. कुडचडे येथे ज्या तत्परतेने भाजपने नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला तीच तत्परता सांखळीत नगराध्यक्ष यशवंत माडकर यांच्यावर दाखल केलेल्या अविश्वास ठरावाच्या बाबतीत सरकार दाखवत नाही. यावरून भाजपचे दुटप्पी धोरण उघड होते, अशी टीका कामत यांनी केली आहे.