बाराबंकीमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे विधान
भाजपचे स्टार प्रचारक संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चौथ्या तसेच पाचव्या टप्प्यातील मदारसंघांमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली आहे. राजनाथ यांनी रविवारी बाराबंकीमध्ये प्रचारसभा घेतली आहे. बाराबंकी येथील हैदरगढ हा राजनाथ यांचा एकेकाळी मतदारसंघ राहिला आहे. त्यांनी भाजप उमेदवार दिनेश रावत यांच्या समर्थनार्थ प्रचार केला आहे. भाजपने उत्तरप्रदेशला भय तसेच भुकेच्या समस्येपासून मुक्ती दिली आहे. भाजप सरकारने कोरोना संकटकाळात देशाच्या 80 कोटी लोकांसाठी मोफत धान्याची व्यवस्था केली. याचबरोबर लोकांना छत देखील उपलब्ध करण्यात आले आहे. सरकारने गरजूंना घर देण्यासह मोफत गॅस सिलिंडर देखील उपलब्ध करविला. भाजप जनतेचा विश्वास कदापिही मोडणार नसल्याचे राजनाथ यांनी म्हटले आहे.
आम्ही समाजवादी देखील आहोत आणि जगाला चोख प्रत्युत्तर देणारे खरे राष्ट्रवादी देखील आहोत. भाजप डोळे खाली करून नव्हे तर नजरेला नजर भिडवून बोलणारा पक्ष आहे. भाजपच्या बोलण्यात आणि कृतीत कुठलाच फरक नाही. बाराबंकी जिल्हा हा समाजवाद्यांचा बालेकिल्ला राहिला आहे. देश-राज्यात काँग्रेस सरकार असताना येथील जनता रामसेवक यादव आणि डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यासोबत उभी राहायची. परंतु नकली समाजवादी येताच जनतेने त्यांना नाकारले आहे. समाजवादी सर्वांना सोबत घेऊन चालणारा असतो, तो तुष्टीकरण करून समाजाला विभागून राजकारण करणारा नसतो. सद्यकाळातील समाजवादी हे खोटी नाणी ठरले आहेत अशी टीका राजनाथ यांनी केली आहे.
जनसंघाच्या स्थापनेवेळी बहुमताचे सरकार आल्यावर काश्मीरमधून कलम 370 हटविणार असल्याचे म्हटले होते आणि ते आम्ही करून दाखविले आहे. नागरिकत्व कायदा आणून शेजारी देशांमध्ये अत्याचाराला तोंड देत जगणाऱया लोकांना मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम केले. अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे वचनही आम्ही पूर्ण केल्याचे संरक्षणमंत्री म्हणाले.