ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुलगा शुभ्रांशू रॉय याच्यासह तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुकुर रॉय यांच्या या घरवापसीमुळे भाजपला मोठा धक्का बसला. दरम्यान, आता गृह मंत्रालयाकडून मुकुल रॉय यांची सुरक्षा देखील काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासंबधीचा आदेश देखील काढण्यात आला आहे.
दरम्यान, तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर केंद्राकडून मुकुल रॉय यांना वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली होती. तर, बंगाल विधानसभा निवडणुकीअगोदर या सुरक्षेत वाढ करून झेड श्रेणीचा सुरक्षा करण्यात आली होती.
तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मुकुल रॉय यांनी गृहमंत्रालयाला पत्र पाठवून त्यांना पुरवण्यात आलेली सुरक्षा परत घेण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारकडून अगोदर त्यांच्या मुलाची सुरक्षा काढून घेण्यात आली होती, त्यानंतर आता मुकुल रॉय यांची देखील सुरक्षा काढण्यात आली आहे.
तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मुकुल रॉय यांनी, मी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सध्या बंगालमध्ये जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीत भाजपमध्ये कुणीही राहू शकत नाही. असे माध्यमांशी बोलताना सांगितले होते.
दरम्यान, मुकुल रॉय हे टीएमसी सोडणारे सर्वात पहिले नेता होते. पक्षविरोधी कारवायाच्या ठपका ठेवत तृणमूल काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी बाहेर केले होते. टीएमसीमध्ये असताना मुकुल रॉय हे ममता बॅनर्जी यांच्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे नेते मानले जात होते. मात्र 2017 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.