आसाममध्ये प्रचारसभा ः सोनोवल अन् शर्मांवर शरसंधान
वृत्तसंस्था / गुवाहाटी
आसामच्या गोलाघाट जिल्हय़ातील सरुपथारमध्ये काँग्रेस महासचिव प्रियंका वड्रा यांनी सोमवारी प्रचारसभा घेतली आहे. या सभेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि अर्थमंत्री हेमंत विश्व शर्मा यांची तुलना धृतराष्ट्र आणि शकुनी या महाभारतातील पात्रांशी केली आहे. आसाम भाजपमध्ये दोन गट आहेत. महाभारतात शकुनी मामा आणि धृतराष्ट्र होते, तसेच सध्यायच आसाम सरकारमध्ये एक शकुनीसारखा तर दुसरा धृतराष्ट्रासारखा नेता आहे. दोघांनीही आसामच्या लोकांना फसविले असल्याचा आरोप वड्रा यांनी केला आहे.
धृतराष्ट्रासारख्या नेत्याला जातीयवादी नायक म्हटले जात होते. त्यांनी सहा समुदायांना वेळा दर्जा मिळणार असल्याचे म्हणत फसविले आहे. दुसरा नेता शकुनी मामाप्रमाणे भ्रष्टाचार करून असे राजकारण करतो, ज्यातून केवळ जनतेचा विश्वासघातच होत असतो. 2014 च्या एसआय भरती घोटाळय़ात त्याचे नाव आले, पण कुठलीच कारवाई झाली नसल्याचा दावा प्रियंका यांनी केला आहे.
भाजप अन् माफियांचं साटंलोटं
भाजप आसाममध्ये एक राजकीय पक्ष नव्हे तर माफिया पक्ष आह. रिमोटद्वारे सरकार चालत असून पक्ष माफियांकडे ओलीस आहे. भाजपच्या नेत्यांना पक्षातच आदर मिळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सभेत एकाचे तर दुसऱया ठिकाणी दुसऱया नेत्याचे नाव घेत ओहत. पक्षातच मतभेद असल्यास राज्यात स्थिर सरकार कसे देणार असे प्रश्नार्थक विधान प्रियंका यांनी केले आहे.
तरुण गोगोईंचा अपमान
काँग्रेसने आसामचा अपमान केल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला होता. तरुण गोगोई हे राज्याचे मुख्यमंत्री होती. आसामची अस्मिता आणि संस्कृतीसाठी ते समर्पित होते हे राज्यातील प्रत्येक व्यक्ती जाणतो. गोगोईंनी स्वतःचे पूर्ण जीवन आसामसाठी दिले. महिलांना नोकऱयांमध्ये 30 टक्के आरक्षण दिले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 50 टक्के आरक्षण दिल्याचे उद्गार प्रियंका यांनी काढले आहेत.
काँग्रेस हमी देते
भाजपप्रमाणे काँग्रेस आश्वासने नव्हे तर हमी देत आहे. राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यास 5 लाख नोकऱया देऊ. भाजपप्रमाणे 25 लाख नोकऱयांची थाप आम्ही मारणार नाही. चहामळय़ातील मजुरांना 365 रुपये प्रतिदिन मिळणार आहे. महिलेला दर महिन्याला 2 हजार रुपयांची मदत मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.