उत्तर प्रदेशसह विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्याचबरोबर सत्ताधारी भाजप अंतर्गत ‘नंबर दोन’ ची लढाई तीव्र होण्याची शक्मयता आहे.
2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून आजपर्यंत तरी सरकारात आणि पक्षात गृहमंत्री अमित शहा हेच निःसंशय नंबर दोन राहिले आहेत. पण उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिंकली तर ते ‘आपणच मोदी यांचे खरे वारसदार’ आहोत असे प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे जाहीर करून शहा यांना तगडे आव्हान उभे करू शकतात. योगी हे साधे प्रकरण नव्हे. भगवी वस्त्रे घालत असले तरी ते बेरके राजकारणी आहेत. नेत्याचे सारे गुण अवगुण त्यांच्यात आहेत. मूळचे उत्तरप्रदेशमधील असल्याने राजकारण त्यांच्या नसानसात खेळते आहे. पूर्व उत्तर प्रदेशमधील त्यांच्या गोरखपूर विभागात ते पूर्वीपासून एक दबंग नेता म्हणून ओळखले जातात. त्याकाळी त्यांच्या अधिकारक्षेत्रात मनासारखा उमेदवार भाजपने उभा केला नाही तर त्याला पाडण्याचे काम ते मनापासून करायचे. त्यांनी स्थापन केलेल्या ‘हिंदू युवा वाहिनी’ ने वेळोवेळी आपला झटका भाजपला दाखवला आहे. जहाल हिंदुत्ववादी हे केव्हापासून योगी यांना मोदींचा ‘नैसर्गिक वारसदार’ मानतात. हिंदुत्वाची मशाल पेटती ठेवायची असेल तर ‘योगींना पर्याय नाही’ असाच निर्वाळा उत्तरेकडील जहाल मंडळींमध्ये फेरफटका मारला तर मिळतो. जम्मू आणि काश्मीरमधील वादग्रस्त 370 कलम रद्द करण्याचे ऐतिहासिक काम अमित शहा यांनी केले असले तरी भाजपच्या मतपेढीमध्ये योगींचें वाढते आकर्षण हा गृहमंत्र्याकरता दिवसेंदिवस एक चिंतेचा विषय होत आहे.
राजधानीच्या राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार तर योगी-शहा यांच्यातील शीतयुद्ध हे गेल्या वर्षांपासून जास्तच पेटले आहे. गेल्या मार्च-एप्रिलमध्ये मुख्यमंत्री म्हणून योगींना नारळ देण्याचा कार्यक्रम शहा यांनी आखला होता. त्यात आयत्या वेळी माशी शिंकली. घाग योगींनी म्हणे ‘नागपूर’ चा धावा केला आणि संघाने अभयदान दिल्याने मुख्यमंत्र्यांना जीवदान मिळाले. कोणाला आवडो अथवा नावडो, पण गेल्या वषीच्या बऱयाच घटनांचा प्रभाव यावषी भाजपवर पडणार आहे. त्यात कोविड महामारीची दुसरी लाट सत्ताधारी मंडळींनी कशी हाताळली, ऑक्सिजनचा तुडवडा कशामुळे पडला?, लसीकरण किती वेळेवर सुरु झाले, आर्थिक विपन्नावस्थेत अडकलेल्या लोकांना कसा आणि कितपत दिलासा मिळाला याचादेखील विचार होणार आहे. अचानक आलेल्या ओमिक्रॉनमुळे जनमानसात पुन्हा एकदा महामारीविषयी असंख्य प्रश्न उपस्थित झाले आहेत ही खचितच सत्ताधाऱयांकरता अनुकूल गोष्ट नाही. या वषी होणाऱया सात राज्यातील निवडणुकात
पंजाबमध्ये भाजपला फारसे स्थान नाही आणि तिथे सत्ताधारी काँग्रेसची लढाई ही आम आदमी पक्षाशी दिसत आहे. उरलेल्या सहा राज्यात उत्तर प्रदेश सोडला तर बाकी सगळीकडे मुख्यत्वे भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना आहे. त्यात गोवा, मणिपूर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि गुजरातचा समावेश आहे. गुजरात आणि हिमाचलच्या निवडणूका वर्षाअखेरीस आहेत.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपकडून जोरदार ढोलनगारे वाजवले जात असले तरी निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसा योगींचा जलवा कमी होत आहे याची जाणीव सत्ताधाऱयांना झाल्याने त्यांनी मोदी हा त्यांचा हुकुमी एक्का बाहेर काढला आहे. बंगालमध्ये रान उठवणारे शहा हे उत्तरप्रदेशात सध्या तरी दमाने घेत आहेत असे दिसत आहे. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा असले तरी पक्षातील निर्णय प्रक्रियेत त्यांचा वाटा अगदीच नगण्य. गेल्या वषी मोदींनी जेव्हा मंत्र्यांना एका झटक्मयात काढले तेव्हा त्या मंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगण्याचे काम इमानेइतबारे नड्डा साहेबांनी केले होते इतकेच. काँग्रेसमधील ‘नंबर दोन’ ः
राहुल गांधी अशा मोक्मयाच्या क्षणी परदेशी जाऊन बसल्याने काँग्रेसची निवडणूक मोहीम थंडावली नसली तरच नवल ठरले असते. ‘काँग्रेसचे जेव्हढे वाईट व्हायचे होते ते झाले आहे, याच्यापेक्षा काय वाईट होणार आहे’ असाच विचार करून राहुल परदेशी गेले असतील. पक्षातील कोणत्याही पदावर नसले तरी राहुल हे काँग्रेसमधील ‘नंबर दोन’ आहेत. त्यांची आई सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष असल्यामुळे ‘नंबर एक’ आहेत. पण प्रत्यक्षात बघितले तर सोनियानींच पक्षात अशी अनौपचारिक व्यवस्था लावून दिली आहे कि राहुल हे खरे ‘नंबर एक’ आहेत आणि प्रियांका गांधी ‘नंबर दोन’. सोनिया पक्षाध्यक्ष म्हणून राहिल्या आहेत ते फक्त आपल्या बाळाकरता काँग्रेसचे ‘सिंहासन’ राखण्यासाठी. गांधी घराण्याशिवाय हे पद कोणाच्याही हातात पडू नये यासाठी त्यांनी जागा धरून ठेवली आहे. स्टेट ट्रान्स्पोर्टच्या बसेसमध्ये रुमाल टाकून जागा धरतात तशातला हा प्रकार. पक्षच घराणेशाहीत मुरलेला असल्याने कोणाला त्यात गैर वाटतच नाही. 21 व्या शतकाच्या राजकारणात घराणेशाही कितपत बरोबर याबाबत वाद असणे साहजिक आहे पण कितीही टक्केटोणपे खाल्ले तरी देशातील सर्वात जुन्या पक्षाला त्या मार्गाने जावयाचे आहे त्याला काय करावे? तात्पर्य काय तर काँग्रेसमधील नंबर एक ते नंबर तीन जागा या एकाच घराण्याने व्यापल्या आहेत.
जवळजवळ सर्वच प्रादेशिक पक्षात घराणेशाही थोडय़ाफार प्रमाणात बोकाळली असल्याने नेत्याचा जवळचा नातेवाईकच ‘नंबर दोन’ पदावर विराजमान केला गेला आहे. ममता बॅनर्जींचा पक्षदेखील त्याला अपवाद नाही. ममतांचा 34-वर्षाचा पुतण्या अभिषेक हा पक्षामध्ये अतिशय वजनदार म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत पण सुप्रिया सुळे देखील वजन राखून आहेत. मायावतींच्या पक्षात त्यांचा राजकीयदृष्टय़ा नवशिखा पुतण्या आकाश आनंद पक्षाचा राष्ट्रीय समन्वयक आहे. तेलंगणातील तेलंगणा राष्ट्र समितीत मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या मुलाचाच बोलबाला आहे. द्रमुकमध्ये करुणानिधी यांचे घराणेच पक्ष चालवत आहे. समाजवादी पक्षात अखिलेश यादव यांनी अजून कोणाला नंबर दोन बनवलेले नाही. ओरिसामध्ये देखील बिजू जनता दलाच्या नवीन पटनाईक यांचा एकखांबी तंबू आहे. त्यांच्यानंतर त्यांचा कोणी भाचा/पुतण्या पुढे आणला जाऊ शकतो. नॅशनल कॉन्फरेन्समध्ये फारूक अब्दुल्ला यांनी मुलगा ओमरला पद्धतशीरपणे पुढे आणले. ज्या डाव्या पक्षात घराणेशाही अजिबात नाही त्याकडे फारशी कोठली सत्ताही उरलेली नाही. भाजपसाठी 2022 उजाडले ते नवी आव्हाने घेऊन. त्यातील एक आव्हान हे ‘नंबर दोन’ पटकावण्याकरता शह-काटशह कसे चालणार आणि त्यातून पक्ष सही सलामतीत कसा बाहेर पडणार हे आहे. सत्ता हे रसायनच असे अजब आहे.
सुनील गाताडे