मुंबई/प्रतिनिधी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतल्या निवासस्थानांवर ईडीनं छापे टाकल्यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स देखील बजावले आहेत. दरम्यान देशमुखांनी ईडी समोर हजर राहण्यासाठी सात दिवसांचा कालावधी मागितला आहे. दरम्यान समन्स बजावून या चौकशीसाठी अद्याप अनिल देशमुख उपस्थित राहिले नसले, तरी त्यावरून आता विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे. भाजपाकडून या मुद्द्यावरून सत्ताधारी महाविकासआघाडीला लक्ष्य केलं जात असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी “अनिल देशमुख यांची एक बाजू आहे. ती समजून घ्यायला हवी. भाजपाच्या लोकांवर कधी असे आरोप झाले नाहीत का? सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत का? ते सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? बाकी सगळे हरामखोर आहेत का?” असा खोचक सवाल संजय राऊत यांनी भाजपा केला आहे.
अनिल देशमुख यांना ईडीनं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. दरम्यान भाजपकडून सातत्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. त्यावर संजय राऊतांनी आज पत्रकारांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला.