मोईरंग / वृत्तसंस्था
मणिपूरमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतरच दहशतवादाविरोधात खऱया अर्थाने अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाचा सुपरिणाम आता दिसत असून हे राज्य दहशतवादमुक्त झाले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. ते या राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱयावर असून शुक्रवारी त्यांनी विविध लोकोपयोगी विकास प्रकल्पांच्या कोनशीला स्थापन केल्या.
प्रकल्पांच्या कोनशीला स्थापन केल्यानंतर त्यांनी जाहीर सभेत भाषण केले. केंद्रातील भाजप आणि रालोआ सरकारच्या ‘पूर्वेकडे पहा’ या धोरणामुळे या क्षेत्राचा विकास झपाटय़ाने होत आहे. देशाच्या ईशान्य भागाकडे आतापर्यंतच्या सरकारांनी कमालीचे दुर्लक्ष केले, त्यामुळे हा भाग अविकसीत राहिला. परिणामी येथे फुटीरतावाद आणि दहशतवाद वाढला. या फुटीचा लाभ सीमेपलिकडील देशांना मिळाला. भाजप सरकारने आता मागच्या सरकारच्या चुका दुरुस्त करण्याकडे रक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे विकासाला गती मिळाली ही बाब त्यांनी मांडली.
शहा यांनी यावेळी काँगेसवरही जोरदार टीका केली. काँगेसने देशाच्या सीमांच्या संरक्षणाची व्यवस्था योग्य प्रकारे केली नाही. सीमांवर मार्ग बांधणी केली नाही. त्यामुळे घुसखोरीला मुक्तद्वार मिळाले. तसेच सीमांचे संरक्षण करणाऱया सैनिकांना त्वरित हालचाली करण्यासाठी अनुकूलता उरली नाही. यामुळे भारत सीमांवर कमकुवत राहिला आहे. आता भाजप आणि रालोआ सरकारने या त्रुटी दूर करुन सीमांवर पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, ही बाब त्यांनीं स्पष्ट केली.